कांद्याची निर्यात बंदी मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 05:08 PM2020-09-19T17:08:34+5:302020-09-19T17:26:31+5:30
कळवण : देशातील कांद्याचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्राच्या या अनपेक्षित निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कांदा निर्यातीवर केंद्राने बंदी घातल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
कळवण : देशातील कांद्याचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्राच्या या अनपेक्षित निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कांदा निर्यातीवर केंद्राने बंदी घातल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
संपूर्ण देश जेव्हा लॉकडाऊन होता त्यावेळेस शेतकरी शेतामध्ये राबून अन्नधान्य पिकवत होता. आधीच हवालदिल असलेल्या शेतकºयास केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी घालून मोठी चपराक दिली आहे. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून तो लवकरात लवकर मागे घ्यावा, अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा कळवण तालुका काँग्रेस कमिटीने दिला आहे.
कळवण तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदार बी. ए. कापसे यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे.
कोरोना आल्यापासून शेतकरी संकटात सापडलेला असल्याने केंद्र सरकारने पुन्हा शेतकºयांना संकटात टाकू नये. केंद्राच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होतील. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, माजी आमदार काशिनाथ बहिरम, सुमित्रा बहिरम, माजी सभापती बळीराम देवरे, माजी नगराध्यक्ष मयूर बहिरम, अतुल देवरे, मनोहर पवार, रामा पाटील, विजय पाटील, हिरामण वाघ आदी उपस्थित होते.