हे कोणा कोणाच्या शड्डूचे आवाज आहेत रे?

By Admin | Updated: July 6, 2014 00:20 IST2014-07-05T20:35:08+5:302014-07-06T00:20:43+5:30

हे कोणा कोणाच्या शड्डूचे आवाज आहेत रे?

Who is this voice of someone's shack? | हे कोणा कोणाच्या शड्डूचे आवाज आहेत रे?

हे कोणा कोणाच्या शड्डूचे आवाज आहेत रे?


हेमंत कुलकर्णी/नाशिक:

सध्या महाराष्ट्रातल्या चारही मोठ्या तालमींमधून ‘हुंयाक हप्पाक’चे, दंड बैठका काढण्याचे आणि शड्डू ठोकण्याचे जोरदार आवाज बाहेर पडत आहेत. तशीही आपली मराठी माती मल्लांची, त्यामुळे असे आवाज निघणारच. पण इथे जरा गडबड आहे. नेमके कोण कोणाच्या विरुद्ध शड्डू ठोकतो आहे आणि कोण कोणाला आव्हान देऊन चारी मुंड्या चित करण्याच्या आणाभाका घेतो आहे, हेच या मराठी मातीतील मल्लविद्येच्या चाहत्यांना कळेनासे झाले आहे.
मल्लांची खरी ओळख तशी त्यांच्या तालमीवरुन आणि वस्तादावरुन होत असते. एखाद्यावेळी दोन तालमीत समझोता होतो, त्यातील एक दुसऱ्याला आपणहून चाल देतो. हेतू एकच, कोणीतरी कोणाची तरी पाठ लाल मातीत लोळवायची.
वीस-पंचवीस वर्षांपूर्वी अशाच दोन तालमी आणि दोन वस्ताद एकत्र आले. त्यातली एक तालीम मुंबईची. तालमीच्या दर्शनी भिंतीवर भलामोठा ढाण्या वाघ. या तालमीशी दुसऱ्या तालमीनी समझोता केला. कलियुगात राहून त्रेतायुग असल्यागत वावरणाऱ्या या तालमीच्या भिंतीवर नव्हे तर, रथावर चक्क कमळ! म्हणजे विजोड जोडच म्हणायचा. पण झाली बुवा त्यांची युती! आणि ती फळलीदेखील महाराजा.
या युतीला आता कसे बरे लोळवावे, या विचारात गढलेल्या विरुद्ध पार्टीच्या दोन तालमींनीसुद्धा मग एकत्र यायचा विचार केला. त्यातली एक थेट बारामतीची आणि दुसरी असली इथलीच, तरी तिचे वस्ताद तिकडचे दूरदेशीचे. म्हटलं तर इथंही जोड तसा विजोडच. पण झाली बुवा एकदाची आघाडी! तीदेखील बघता बघता, फळाला आली की राव!
पण मग आताच असे अचानक काय झाले? जो तो दुसऱ्याच्या अंगावर धाऊन जायला लागला. पहल कोणी केली कोण जाणे? पण चला आता, तालमी वेगवेगळ्या करा, असे सारे म्हणजे चौघेही म्हणू लागले. या साऱ्यांना अचानक असा आत्मबलाचा साक्षात्कार कुठून आणि कसा झाला बरे?
कुरबुरी, परस्परांवर कुरघोड्या, एकमेकांची उणीदुणी असे सारे पहिल्यापासून सुरुच होते. त्यात कधीही खंड पडला नव्हता. आखाड्यात कधी यांचा तर कधी त्यांचा मल्ल. पण आपला मल्ल असेल तर त्याला सतत प्रोत्साहन द्यायचे आणि भागीदारीतला असला तर तोंड फिरवून घ्यायचे, हे तर सुरुच होते. तरीही दोन्ही तालमीतले वस्ताद हे साटेलोटे म्हणा, विळ्या भोपळ्याची मोट म्हणा वा सोयीची सोयरीक म्हणा तोडत नव्हते वा तुटू देत नव्हते.
कारण एकच. युती काय किंवा आघाडी काय, यांचा संबंध वस्तादांशी, मल्लांशी वा कुस्त्या लावणाऱ्यांशी नव्हता, तर तो होता आणि आहे, दोन्हीकडच्या मल्लांच्या चाहत्यांशी, पाठीराख्यांशी. ते सैरभैर होऊ नयेत. सतत आपल्या पाठीशी रहावेत, त्यांच्या समर्थन आणि प्रोत्साहनातून मिळणाऱ्या ऊर्जेतच आपले यश आणि अपयश लपलेले आहे याची जाण काट्याची वाडी असो, आंबेजोगाई असो, हस्तिनापूर असो, शिवाजी पार्क असो की नागपूर असो, तेथील वस्तादांना चांगलीच होती. पण आता असे कानठळ्या बसविणारे शड्डूंचे आवाज आणि तेदेखील पोरसवदा मल्लांकडून निघत असतील तर, वस्ताद गलितगात्र झाले म्हणायचे, त्यांच्या पिळदार स्नायूंना शैथील्य आले म्हणायचे की पोरासोरांसमोर तेही हतबल झाले म्हणायचे?

Web Title: Who is this voice of someone's shack?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.