दडलास कुठे रे बापा? : पावसाअभावी पिके मरणासन्न अवस्थेत; नदी-नाले कोरडेठाक; दहा दिवसाआड पाणीपुरवठा
By Admin | Updated: August 26, 2015 23:46 IST2015-08-26T23:44:54+5:302015-08-26T23:46:11+5:30
बागलाणमधील बळीराजा तदुष्काळाच्या छाये!

दडलास कुठे रे बापा? : पावसाअभावी पिके मरणासन्न अवस्थेत; नदी-नाले कोरडेठाक; दहा दिवसाआड पाणीपुरवठा
नामपूर- पावसाळ्याचे तीन महिने कोरडे गेल्याने पिके मरणासन्न अवस्थेत उभी असल्याचे पाहून बागलाण तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतमालाला भाव नाही, तेल्याने डाळिंबाचा घात केला आणि यंदा पावसाने ओढ दिल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट घोंगावू लागले आहे. दहा दिवसाआड होणारा पाणीपुरवठा व पिकांची बिकट अवस्था असे ‘जीवघेणे’ चित्र तालुक्याने यापूर्वी कधीच पाहिले नसल्याने बळीराजा चिंताक्रांत बनला आहे.
प्रारंभीचा अल्प पाऊसवगळता सलग तीन महिने पावसाने ओढ दिल्याने नदी, नाले, धरणे व विहिरी कोरड्याठाक दिसत आहेत. परिणामी पाण्यासाठी सधन समजल्या जाणाऱ्या नामपूरमध्ये सध्या दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने महिलावर्गावर ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने कांदा हे डाळिंबाखालोखाल महत्त्वाचे पीक मानले जाते. मात्र या भागातील जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांचा कांदा आधीच विकला गेला आहे. ज्या १० टक्के शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे, त्यांच्या कांद्याला सहा हजारांचा भाव मिळत आहे. कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळताच दिल्लीश्वरांच्या डोळ्यात पाणी आले आणि ही भाववाढ कमी कशी होईल, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले. मात्र जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले तरी कोणीही चकार शब्द काढत नसल्याने सर्वसामान्यांत सखेद नाराजी व्यक्त होत आहे.
यंदा पावसाळी कांद्यालाही चांगला भाव मिळण्याचा अंदाज वर्तविला जात असला तरी विहिरींनाच पाणी नसल्याने कांदा पिकवायचा कसा या विवंचनेत कांदा उत्पादक सापडले आहेत. पाण्याअभावी कांद्याची पुरेशी लागवड करण्यात अडचणी जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे पावसाळी कांद्याकडून मिळणाऱ्या दोन पैशांच्याही आशा मावळल्या आहेत. मोसम पट्ट्यातील पाण्याची पातळी प्रचंड खालावली आहे. यास वाळू उपसाही कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. मोसम नदीच्या उगमापासून ती ज्या ठिकाणी मिळते या दरम्यान अपवादवगळता मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. त्यामुळे नदी उघडी, बोडकी व भकास दिसू लागली आहे. वाळूमुळे पाणी संचय होऊन ते जमिनीत जिरायचे, त्यामुळे विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ व्हायची. दरम्यान, सध्या होत असलेला वाळू उपसा कायम असाच सुरू राहिला तर हा परिसर भविष्यात वाळवंट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या तालुक्यातील शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नाही. त्याचा थेट परिणाम व्यापारावर झाल्याचे दिसून येत आहे. किराणा, कापड, खते, स्टेशनरी या व्यावसायिकांसह व्यापाऱ्यांनाही त्याचा फटका बसला आहे. यासाठी बागलाण तालुका दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी स्नेहराज सावंत, समीर सावंत, अण्णासाहेब सावंत व सरपंच भाऊसाहेब सावंत आदिंनी केली आहे.