फक्त बारा वर्षांनी भेटून काय उपयोग? - विनय पाठक
By Admin | Updated: July 29, 2014 00:56 IST2014-07-29T00:12:06+5:302014-07-29T00:56:03+5:30
फक्त बारा वर्षांनी भेटून काय उपयोग? - विनय पाठक

फक्त बारा वर्षांनी भेटून काय उपयोग? - विनय पाठक
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याचा कोणताही अनुभव गाठीशी नसताना, गेल्या वेळी प्रशासनाने अल्पावधीत तयारी केली. पण त्यावेळच्या काही त्रुटी आजही कायम आहेत. जसा कुंभमेळा बारा वर्षांनी भरतो, तसेच शासन व प्रशासन बारा वर्षांनीच जागे होते. परिणामी ना कामांची गुणवत्ता राखता येते, ना मूळ प्रश्नांची सोडवणूक होते. तेच तेच प्रश्न कायम उपस्थित होतात. यावर कायमस्वरूपी तोडगा काढायचा, तर कुंभमेळा कक्ष कायम असावा व कुंभमेळा अॅक्ट करण्यात यावा, असे मत माजी अपर जिल्हाधिकारी तथा तत्कालीन मेळा अधिकारी विनय पाठक यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. त्यांचे मनोगत त्यांच्याच शब्दात.
४बारा वर्षांनी एकदा कुंभमेळा भरत असला तरी, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तयारीला बारा वर्षेही अपुरी पडतील, अशी परिस्थिती आहे. परंतु कुंभमेळ्याशी संंबंधित यंत्रणांना त्याचे गांभीर्य कधीच नसते. कारण शासनाकडून मेळा अधिकारी म्हणून फक्त जिल्हाधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले जाते आणि जिल्हाधिकारीदेखील जेव्हा सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर येतो तेव्हाच कामे हाती घेतात. परिणामी थेट बारा वर्षांनंतरच यंत्रणांना जाग येते, त्यामुळे कुंभमेळ्याच्या निमित्ताने इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होऊनही ठोस कामे होत नाहीत.
४ अनादी काळापासून कुंभमेळा सुरू आहे व यापुढेही आणखी किती वर्षे तो भरत राहील, हे सांगता येणार नाही. आज ज्या अडचणी समोर दिसतात त्या यापुढेही राहतील, यात कोणाचे दुमत असणार नाही. म्हणून सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी कक्ष असावा, असा प्रस्ताव देण्यात आला होता. शासनाची अनेक खाती वर्षानुवर्षे चालूच आहेत, तशाच पातळीवर कुंभमेळ्याचे स्वतंत्र कामकाज चालविणारे खाते असावे. त्यासाठी वेगळ्या नियुक्त्या अथवा कर्मचारी, अधिकारी नेमण्याची गरज नाही. आहे त्याच यंत्रणेत हे काम केल्यास त्यात कामकाज करण्यात सातत्य राहील. अगदी उदाहरणच द्यायचे तर कुंभमेळ्यासाठी भूसंपादन करायचे असेल, तर ते एका वर्षात होणे शक्य नाही. कायद्यातच किमान तीन वर्षे भूसंपादनासाठी लागतात, अशा परिस्थितीत एका वर्षात भूसंपादन कसे होणार?
४ अन्य राज्यांप्रमाणे कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र कायदा असावा, अशी मागणी करण्यात आली होती. गेल्या कुंभमेळ्यात पुरोहित संघाने ही मागणी लावून धरली होती. या कायद्यामुळे मेळा अधिकारी असलेल्या व्यक्तीला कायद्याने अधिकार मिळतील, त्याचबरोबर चुकीचे काम करणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी कारवाई करण्याचे बळही प्राप्त होईल. सध्या असे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाही नसल्याने अन्य यंत्रणांकडून पाहिजे तितक्या प्रमाणात सहकार्य मिळत नाही.
४ सिंहस्थ कुंभमेळा आला की, त्याच त्याच प्रश्नांची चर्चा होते, निधी, वेळ, अडचणी पाहता तात्पुरत्या स्वरूपात प्रश्नांची सोडवणूक केली जाते आणि एकदा कुंभ संपला की, असे सातत्याने कळीचे ठरणाऱ्या प्रश्नांचाही विसर पडतो. पुन्हा आठवण होते ती, थेट बारा वर्षांनी.
४ गेल्या सिंहस्थातील अनुभव खूपच वेगळा होता. मागच्या एकही कुंभमेळ्याची माहिती उपलब्ध होईल, असा एकही कागद नव्हता. कुंभमेळ्याचा इतिहास, किती साधू-महंत व भाविक येतील याचा कोणताही अंदाज नव्हता, आखाडे किती, खालसे किती? त्यांची परंपरा काय, त्यांना काय काय सुविधा द्यायच्या याविषयी सारी अनभिज्ञता असतानाही प्रशासनाने हे आव्हान पेलले. अगोदर प्रत्येक आखाडे व खालशांची माहिती घेण्यात आली. त्यांचे प्रमुख कोण? त्यांच्या चालीरिती, मानापमान जाणून घेण्यात आले. त्यावेळी लक्षात आले की, नाशिकला तीन आखाडे वैष्णवांचे व त्र्यंबकला दहा आखाडे शैवांचे स्नान करतात.
४ कुंभमेळा पावसाळ्यातच येत असल्याने अडचणींमध्ये मोठी भर होती. रामकुंडावर तरी स्रानासाठी जागा होती, पण त्र्यंबकेश्वरला कुशावर्त अतिशय अडचणीच्या जागेवर होते. अशात मग कुशावर्तच्या पाठीमागच्या बाजूचा दरवाजा उघडून त्याद्वारे भाविकांना स्रानासाठी पाठविण्याचे ठरले. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरला नवीन बसस्थानक करण्यात आले; परंतु पावसामुळे त्याचा उपयोग होऊ शकला नाही. रिंगरोडमुळे मात्र वाहतूक अन्यत्र वळविण्यात यश आली.
४ प्रशासनाने इतकी तयारी करूनही प्रत्येक वेळी वेगळेच संकट उभे ठाकत होते. दुसऱ्या पर्वणीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे अनी व बडा उदासीन आखाडा यांच्यात प्रथम कोण स्रान करणार यावरून वाद झाला. साधू-महंतांच्या स्रानाशिवाय भाविकांचे स्रान होत नाही, असा रिवाज असल्याने बाका प्रसंग उभा राहिला. परंतु प्रशासनाने तत्काळ निर्णय घेतला व आखाड्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत स्रान न केल्यास भाविकांना स्रानासाठी मोकळीक देण्यात आली.
४ सरदार चौकातील चेंगराचेंगरीला पोलिसांचे नियोजन कारणीभूत होते. या चेंगराचेंगरीची चौकशी करणाऱ्या न्या. रमणी आयोगासमोरही आपण आपले मत व्यक्त केले होते. कारण सरदार चौकात बाहेरगावचे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. त्यांनाच या भागातील पर्यायी मार्गांची माहिती नव्हती. जर गर्दी वाढली तर ती अन्य मार्गाने वळविण्याचा निर्णय तत्काळ घेणे शक्य होते. परंतु बाहेरगावचे पोलीस असल्याने त्यांना ते समजू शकले नाही. यापुढे तरी, अशा संभाव्य ठिकाणी स्थानिक पोलिसांची नेमणूक केली जावी, अशी शिफारस आपण आयोगाकडे केली होती.
४ सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दरवेळी भेडसाविणाऱ्या प्रश्नांवर तात्पुरता उपचार करून भागणार नाही. शहरात मोठ्या संख्येने येणारी वाहने वळविण्यासाठी रिंगरोड हवेत, सिंहस्थात त्यांची कामे हाती घेण्यात आली, परंतु पूर्ण होऊ शकले नाहीत. तसेच वाहनतळाच्या बाबतीतही तसेच आहे. शहराच्या चारही बाजूंना गेल्या वेळी वाहनतळ उभारण्यात आले होते. आता नवीन वाहनतळासाठी जागा शोधली जात आहे. त्यापेक्षा एकदाच कायमस्वरूपी वाहनतळासाठी जागा संपादित केली, तर हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघू शकतो. (पूर्वार्ध)