जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचं काय?

By Admin | Updated: May 7, 2014 22:51 IST2014-05-07T22:49:59+5:302014-05-07T22:51:21+5:30

सिन्नर : दररोज मानसी २० लिटर पिण्याचे पाणी दिले जात असल्याचे कारण सांगून शासनाकडून वाढीव टँकरच्या फेर्‍या मंजूर केल्या जात नसतील.

What about animal drinking water? | जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचं काय?

जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचं काय?

सिन्नर : दररोज मानसी २० लिटर पिण्याचे पाणी दिले जात असल्याचे कारण सांगून शासनाकडून वाढीव टँकरच्या फेर्‍या मंजूर केल्या जात नसतील, तर शेतकर्‍यांनी जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कसा सोडवावा, असा सवाल सिन्नर पंचायत समितीच्या टंचाई आढावा बैठकीत तालुकाभरातून आलेल्या ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला. पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने टॅँकरच्या फेर्‍या वाढविण्यासह टंचाई निधीतून पाणीपुरवठा योजनेची कामे व दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची एकमुखी मागणी बैठकीसाठी आलेल्या सरपंच व पदाधिकार्‍यांनी केली. सिन्नर पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब वाघ यांच्या अध्यक्षतेखाली नळपाणीपुरवठा योजना व टॅँकरद्वारे करण्यात येणार्‍या पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य रामदास खुळे, राजेंद्र घुमरे, प्रकाश कदम, नामदेव शिंदे, नवनाथ मुरडनर, भाऊसाहेब दळवी, लघु पाटबंधारे खात्याचे शाखा अभियंता व्ही.आर. इंगळे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी एस.के. सोनवणे, अनिल निरगुडे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. टंचाई आढावा बैठक सुुरू झाल्यानंतर पंचायत समितीचे सभापती वाघ यांनी गावोगावच्या ग्रामसेवक व सरपंचांकडून पिण्याच्या पाण्याची परिस्थिती समजावून घेतली. अनेक ग्रामसेवक व सरपंचांनी टॅँकरच्या फेर्‍या वाढवून देण्यासाठी प्रस्ताव पाठविले असल्याचे सांगितले. ज्या गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत नाही त्या ग्रामपंचायतींच्या वाड्या-वस्त्यांसाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव प्रलंबित असून, ते टंचाई निधीतून तातडीने मंजूर करण्याची मागणी पदाधिकार्‍यांनी केली. टॅँकरच्या मागणीसाठी व टंचाई निधीतून करण्यात येणार्‍या पाणीपुरवठा योजनेचे अपूर्ण प्रस्ताव पाठवू नये व पूर्ण केलेले प्रस्ताव लघु पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंत्यांकडे देण्याची सूचना वाघ यांनी केली. टंचाईच्या काळात ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना सहकार्य करण्याचे आवाहन वाघ यांनी केले. ज्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाकडून टॅँकर सुरू असेल त्या गावातील ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी ग्रामपंचायत पातळीवर पाणीवाटपाचे नियोजन करावे, अशी सूचना वाघ यांनी केली. पाण्याचा धर्म असून, आपआपसात भांडणे न करता सर्व वस्त्यांना पाणीवाटप करताना समान न्याय द्यावा असे वाघ म्हणाले. टंचाई आढावा बैठकीसाठी नवनाथ घुगे, उत्तम आव्हाड, सुधाकर शिंदे, एकनाथ आव्हाड आदिंसह तालुकाभरातून आलेले ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: What about animal drinking water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.