कालवा चारी फोडल्याने पाण्याचा अपव्यय
By Admin | Updated: September 22, 2015 22:52 IST2015-09-22T22:43:14+5:302015-09-22T22:52:35+5:30
कालवा चारी फोडल्याने पाण्याचा अपव्यय

कालवा चारी फोडल्याने पाण्याचा अपव्यय
देवळा : चणकापूर उजव्या कालव्याला चणकापूर धरणातील पाणी सोडल्यानंतर कालवा फोडण्याचे किंवा चारीचे गेट उघडून देण्याच्या घटना दरवर्षी सातत्याने घडत आहेत. त्यामुळे दरवर्षी हजारो क्यूसेक पाणी वाया जाते व रामेश्वर धरण भरण्यास विलंब झाल्याने तालुक्याचा पूर्व भाग पाण्यापासून वंचित राहतो आहे; मात्र याकडे पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असल्याने अशा गैरप्रकारांमध्ये वाढ होत आहे.
रविवारी (दि. २०) चणकापूर उजव्या कालव्याला चणकापूर धरणातील पूरपाणी सोडल्यानंतर वरवंडी येथे ११ नंबरच्या चारीचे गेट अज्ञात इसमांनी फोडल्याने रामेश्वर धरणात कालव्याद्वारे येणाऱ्या पाण्याचा प्रवाह बंद झाला. सोमवारी दुपारी देवळा व कळवण येथील पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ११ नंबरची चारी बंद केल्यानंतर कालव्याला पूर्ववत पाणी वाहू लागले. यामुळे रामेश्वर धरण लवकर भरून कोलती नदीला पाणी येईल, या प्रतीक्षेत येथील ग्रामस्थ आहेत.
तालुक्याच्या पश्चिम भागात चांगला पाऊस झाला. रामेश्वर धरण वगळता वार्शी, दोडी, कोलते, वडाळा, कनकापूर येथील सर्व धरणे पूर्ण भरली आहेत. चणकापूर उजवा कालवा सुरळीतपणे चालल्यास रामेश्वर धरण लवकरच १०० टक्के भरेल् अशी अपेक्षा आहे. तालुक्यातील वरवंडी येथे पाऊस झाल्यानंतर डोंगरउतारावरील पाणी वाहून जाण्यासाठी चणकापूर उजव्या कालव्यावर बांधलेली भूमिगत मोरी गाळाने भरून बंद झाल्यामुळे डोंगरउतारावरील सर्व पाणी कालव्यात वाहून जात असल्याने वरवंडी गावाला नैसर्गिकरीत्या मिळणाऱ्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून, जुन्या मोरीच्या जागेवर अधिक क्षमतेची नवीन मोरी (सुपर पॅसेंजर) बांधण्याची मागणी केली आहे. चारी नं. ११ शेजारी असलेली मोरीदेखील गाळाने भरली. या नाल्यावर पुढे सात नालाबांध पद्धतीचे बंधारे आहेत. परंतु डोंगराचे पाणी अडवले जाऊन ते उजव्या कालव्यात वाहून जाते. यामुळे हे नालाबांधदेखील कायम कोरडेच राहतात. मोरीच्या सदोष कामामुळे ह्या नालाबांधासाठी शासनाने केलेला खर्चदेखील वाया गेला असून, कालव्याचे पाणी बंद झाल्यानंतर वरवंडी गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या मोरीशेजारीच भाऊसाहेब आहेर यांची (गट नं. ६) शेती आहे. मोरी गाळाने भरल्याने डोंगरउतारावरील पाणी त्यांच्या शेतात शिरत असल्याने त्यांचे सोयाबीन व बाजरी पिकाचे नुकसान झाले आहे. असे नुकसान त्यांना दरवर्षी सोसावे लागते.
पाण्यामुळे कालव्याचेही अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. भर वाहून गेल्याने काही जागांवर भगदाड पडली आहेत. डोंगरउतारावरून वाहून येणारा गाळ कालव्यात साठत असल्याने आधीच कमी असलेली कालव्याची वहनक्षमता आणखी कमी होऊ शकते. मोठा पाऊस झाला व अधिक क्षमतेने कालव्याला पाणी सोडल्यास कालव्याला धोका निर्माण होऊ शकतो. सदरचा कालवा तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारित येतो. यापूर्वी वरवंडी ग्रामपंचायतीने मोरी दुरुस्त करण्याबाबतचा ग्रामसभेचा ठराव दिला असून, अनेक वेळा तक्रारी करूनही पाटबंधारे विभाग यासंबंधी ठोस पावले उचलत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. (वार्ताहर)