दोन दिवसाआड पाणीपुरवठा
By Admin | Updated: September 5, 2015 21:38 IST2015-09-05T21:37:40+5:302015-09-05T21:38:23+5:30
मालेगाव : लोकप्रतिनिधी-प्रशासनाचा शिक्कामोर्तब

दोन दिवसाआड पाणीपुरवठा
आझादनगर : मालेगाव शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातील कमी झालेला पाणीसाठा आणि पावसाने फिरवलेली पाठ या पार्श्वभूमीवर शहरास शनिवारपासून एक दिवसाऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील पाणीटंचाईसंदर्भात मनपा महासभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी महापौर हाजी मोहंमद इब्राहिम होते.
शहरास चणकापूर धरणातून तळवाडे साठवण तलावाद्वारे तसेच गिरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र चणकापूर धरणक्षेत्रात यंदा कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. तळवाडे साठवण तलावातील पाणीसाठाही कमी झालेला आहे. मालेगाव-शहर - तालुक्यासह जळगाव जिल्ह्यास पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणातील पाणीसाठा आता तीन टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी गेल्या गुरुवारी मनपा गटनेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र त्याकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. त्यानंतर महापौर हाजी मोहंमद, उपमहापौर हाजी युनूस ईसा व मनपा आयुक्त बोर्डे यांनी संयुक्तरीत्या गिरणा धरणातील पाणीसाठ्याची पाहणी केल्यानंतर तातडीने शनिवारी पाणीपुरवठा आढावा बैठक बोलावली.
या बैठकीत शहराच्या पाणीटंचाईसंदर्भात विशेष महासभा बोलावण्याची मागणी पुढे आली. मात्र मालेगाव विकास आघाडीचे गटनेते सुनील गायकवाड यांनी सध्याची पाणीटंचाई ‘न भूतो’ अशी असल्यामुळे त्याविषयी आजच निर्णय घेण्याची मागणी केली. तिसरा महाजचे नेते एजाज उमर यांनी विशेष महासभेचा कोरम पूर्ण न झाल्यास विषय पुन्हा लांबणीवर पडण्याची आशंका व्यक्त केली. तसेच सध्याचे शहराचे पाणी आरक्षण हे १९७१च्या लोकसंख्येनुसार आहे. आज शहराच्या लोकसंख्येत तीनपट वाढ झाली आहे. शिवाय हद्दवाढ झाल्यामुळे पाणीआरक्षणात वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावर उपमहापौर युनूस ईसा यांनी यासंदर्भात मनपातर्फे ठराव करून राज्य सरकारकडे त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. तसेच त्यासाठी येत्या ११ सप्टेंबरच्या महासभेत चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.
सदर बैठकीस प्रा. रिजवान खान, शिवसेनेचे गटनेते मनोहर बच्छाव, सखाराम घोडके, मोहंमद आमीन, रफीक शेख, एजाज बेग आदि नगरसेवक व मनपा अधिकारी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)