पाणीपुरवठा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2016 22:43 IST2016-02-17T22:42:35+5:302016-02-17T22:43:04+5:30
कणकोरी योजना : थकीत वीज देयक भरले

पाणीपुरवठा सुरू
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या थकीत वीज देयकाची रक्कम अदा केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. चार दिवसांपासून ठप्प असलेल्या योजनेचा पाणीपुरवठा मंगळवारपासून पुन्हा सुरू करण्यात आला.
भोजापूर धरणावरील विहिरीतील विद्युतपंपाचे सुमारे साडेतीन लाख रुपये वीज देयक थकल्याने कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे चार दिवसांपासून नांदूरशिंगोटे व उर्वरित गावांचा नळपाणीपुरवठा ठप्प झाला होता. भोजापूर धरणात पाणी असूनही ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती.
कणकोरीसह पाच पाणीपुरवठा योजना सुरळीत करणे व पाणीपुरवठा समितीची स्थापना करणे यासाठी सोमवारी नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष अनिल सांगळे, सरपंच पांडुरंग आगिवले, अलका म्हस्के, नीलेश जगताप, सुनीता अहिरे, संगीता बर्डे, गोपाळ शेळके, संजय शेळके, रवींद्र शेळके, दीपक बर्के, श्रीकांत वाक्चौरे, अशोक गवारे, हिराबाई आव्हाड, भाऊसाहेब बोडके, काशीनाथ कुऱ्हे, मनीषा शेळके, बाळासाहेब म्हस्के, सचिव जे. जी. वाडगे, लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता टी. पी. राजवाडे आदि उपस्थित होते.
पाच गावांतील प्रत्येकी तीन अशा १५ सदस्यांचा समावेश असलेली नवीन पाणीपुरवठा समिती स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सदर योजनेच्या जलवाहिनीतून पाणी चोरीस होत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. बैठकीच्या प्रारंभी सचिव वाडगे यांनी समितीचे निकष व माहिती दिली. सुमारे सव्वा लाख रुपयांच्या आसपास दरमहा खर्च असलेल्या या
योजनेत सहभागी पाच गावांची पाणीपट्टी प्रत्येक महिन्याला सुमारे ९० हजार रुपये इतकीच जमा होते. त्यामुळे दर महिन्याला २० हजार रुपये थकबाकी वाढत असल्याचे वाडगे यांनी सांगितले. (वार्ताहर)