पाणीटंचाईची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी
By Admin | Updated: May 6, 2017 23:16 IST2017-05-06T23:16:00+5:302017-05-06T23:16:32+5:30
पाणीटंचाईबाबत लोकप्रतिनिधींंनी केलेल्या तक्रारींची प्रशासनाने गंभीर दखल दखल घ्यावी, असा आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिला.

पाणीटंचाईची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर यापुढे टंचाई आराखडा तयार करताना भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन सूक्ष्म कृती आराखडा तयार करावा. केवळ मागील पानावरून पुढे चालू असे करू नये असे सांगत पाणीटंचाईबाबत त्र्यंबक तालुक्यातील सरपंच, लोकप्रतिनिधींंनी केलेल्या तक्रारींची प्रशासनाने गंभीर दखल दखल घ्यावी, असा आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिला.
आज त्र्यंबक पंचायत समितीचा सर्व खात्यांचा आढावा जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्याप्रसंगी सांगळे बोलत होत्या. यावेळी उपाध्यक्ष नयना गावित, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, यतीन पगार, पंचायत समिती सभापती ज्योती राऊत, उपसभापती रवींद्र भोये, जि.प. सदस्य मनीषा पवार, रुपांजली माळेकर-खोसकर, शकुंतला डगळे, रमेश बरफ, पं. स. सदस्य देवराम मौळे, अलका झोले, मनाबाई भस्मे आदी उपस्थित होते.
शीतल सांगळे म्हणाल्या, पाणीटंचाईबाबत त्र्यंबक तालुक्यातील सरपंच, लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या तक्र ारींची दखल प्रशासनाने घ्यावी असे आदेश देऊन त्या म्हणाल्या, त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी दुर्गम असून, उपस्थित अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाल्या त्यांना शासकीय सेवा सवलती देणारे तुम्ही दूत असून, या बांधवांना तुम्ही वंचित ठेऊ नका. सर्व सेविकांचा लाभ द्या. दलित वस्ती सुधार योजनेबद्दल त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, या योजनेचा एक चांगला आराखडा तयार करावा. आरोग्य, महिला व बाल संगोपन, शालेय पोषण आहार अंगणवाड्या आदींचाही परामर्श त्यांनी घेऊन या विषयांना अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे. तर सरपंच लोकप्रतिनिधी यांनी मांडलेल्या सूचना शासकीय स्तरावर घेण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी निश्चित प्रयत्न करू. आपल्या सूचना लेखी स्वरूपात द्या. आपणास निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.
बऱ्याच टंचाईग्रस्त वाड्या पाड्यांवर टँकर देताना, भरलेला टँकर देताना चढावामुळे वर जात नाही, अशी अडचण समोर आली. तर मग अशा वेळेस टंचाईच्या गावांना तुम्ही पाणी कसे देता? असा सवाल उपाध्यक्ष नयना गावित यांनी उपस्थित केला. याबाबत निश्चित असे कोणीच सांगू न शकल्याने नयना गावित यांचा सवाल अनुत्तरित राहिला.
टंचाई या विषयावर बराच खल झाला. यामध्ये विनायक माळेकर, कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, वाघेरा सरपंच जयराम मोंढे सराई आदींसह जि. प. सदस्य रुपांजली माळेकर यांनी नवीन योजना करताना पाण्याचे जिवंत स्त्रोत शोधून त्याच ठिकाणी विहीर बावडी खोदून योजना तयार करावी अशी सूचना केली. त्यानुसार नवीन योजना तयार करताना याही गोष्टींचा समावेश करावा, असे आदेश अध्यक्षांनी दिले. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता नंदनवरे यांनी भारत निर्माण योजना यापूर्वी स्थानिक समित्यांच्या हातीही देऊन पाहिल्या पण अनेक योजनांचा बट्ट्याबोळ झाला. आढाव्यात मुख्य विषय पाणीटंचाई असला तरी अन्य विषयांचादेखील ऊहापोह करण्यात आला. यावेळी उपमुख्य अधिकारी (ग्रामपंचायत ) राजेंद्र पाटील, ल.पा. पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता, सी. डी. वाघमारे, पशुधन अधिकारी डॉ. प्रशांत फलक, शिक्षण अधिकारी प्रवीण अहिरे, देवराव म्हस्के या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व विभागांचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.