समृद्धीच्या अंडरपास खाली साचले ‘पाणीच पाणी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST2021-06-05T04:11:22+5:302021-06-05T04:11:22+5:30
सिन्नर : समृद्धी महामार्ग ओलांडून जाण्यासाठी महामार्गाखालून बनविण्यात आलेल्या अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असल्याचे चित्र आहे. अंडरपासमध्ये ...

समृद्धीच्या अंडरपास खाली साचले ‘पाणीच पाणी’
सिन्नर : समृद्धी महामार्ग ओलांडून जाण्यासाठी महामार्गाखालून बनविण्यात आलेल्या अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असल्याचे चित्र आहे. अंडरपासमध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी एमएसआरडीसीकडून अद्यापही कार्यवाही करण्यात न आल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची सोय होण्याऐवजी आता पुरती ‘गैरसोय’ होऊ लागली आहे.
सिन्नर तालुक्यातील ६३ ठिकाणी अशा प्रकारे अंडरपास काढण्यात आले आहेत. तेथील जमीन लेव्हल काढून अंडरपास खाली जमा होणारे पाणी बंदिस्त गटांच्या माध्यमातून नैसर्गिक ओढ्या-नाल्यांना काढून देणे गरजेचे असताना गेल्या दोन वर्षांपासून एमएसआरडीसीने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने परिसरातील नागरिकांना मात्र प्रत्येक पावसाळ्यात त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. समृद्धी महामार्गाचे काम करताना या परिसरातील गावांच्या नियमित वापराच्या रस्त्यांवर अंडरपासच्या पुलांचे खोदकाम करून बांधकाम करण्यात आले आहे. या प्रत्येक ठिकाणी नियमित रस्त्याच्या समांतर पातळीपेक्षा अडीच ते तीन फूट खोल हे बांधकाम असल्याने प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. पावसाच्या पाण्यामुळे अंडरपासचे रस्ते गाळामुळे निसरडे झाल्याने तेथे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्वरित या अंडरपासखाली ड्रेनेज सिस्टीम कार्यान्वित करावी, अशी मागणी दुशिंगपूरचे सरपंच कानिफनाथ घोटेकर, कहांळवाडीच्या सरपंच वंदना खरात, घोटेवाडीच्या सरपंच मंजुश्री घोटेकर, सोनांबेचे सरपंच डॉ. रवींद्र पवार आदींसह फुलेनगर, निऱ्हाळे, मऱ्हळ, खंबाळे, गोंदे येथील नागरिकांनी केली आहे.
----
गुडघाभर पाणी
सिन्नर तालुक्यात जाणाऱ्या ४६ किमी रस्त्यावरील गटारीचे काम पूर्णत: बाकी असल्याने हा पावसाळा समृद्धी महामार्ग छेदणाऱ्या गावांसाठी त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे किमान तात्पुरत्या स्वरूपात अंडरपास खाली नाल्या तयार करून तेथील पाणी नैसर्गिक उताराकडे काढून देत नागरिकांची अडचण दूर करण्याची मागणी होत आहे. या ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम राबविण्यात येणार असली तरी अद्याप त्याचे काम करण्यात आले नसल्याने सर्वत्र अंडरपासमध्ये पाणी तुंबत आहे. काही ठिकाणी दीड ते दोन फूट उंचीचे पाणी या अंडरपास खाली साठत असल्याने नागरिकांना या पाण्यातून मार्गक्रमण करणे अवघड होऊन बसले आहे. दुचाकी, चारचाकी गाड्यांच्या सायलन्सरमध्ये पाणी घुसून त्या मधेच बंद पडत आहेत. पायी चालणाऱ्यांना या मार्गावरून गुडघाभर किंवा त्यापेक्षा अधिक उंचीच्या पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे.
---------------------
सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील वावी-सायाळे या प्रमुख रस्त्यावर दुशिंगपूरजवळच्या अंडरपास खाली साचलेले पाणी. (०४ सिन्नर समृद्धी)
===Photopath===
040621\04nsk_14_04062021_13.jpg
===Caption===
०४ सिन्नर समृद्धी