बंधारा खोलीकरणाच्या कामात सापडला पाण्याचा झरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2016 00:02 IST2016-06-05T22:42:13+5:302016-06-06T00:02:42+5:30

चिंचोली : जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लागला मार्गी

Water foil found in the building | बंधारा खोलीकरणाच्या कामात सापडला पाण्याचा झरा

बंधारा खोलीकरणाच्या कामात सापडला पाण्याचा झरा

 नायगाव : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सध्या सर्वत्र बंधारे खोलीकरणाची कामे जोमात सुरू आहेत. अशाच प्रकारचे काम सिन्नर तालुक्यातील चिंचोली गावात सुरू असताना चक्क पाण्याचा झराच सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असताना सापडलेल्या या झऱ्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने समाधान व्यक्त होत आहे.
सर्वत्र भीषण दुष्काळाच्या झळा जाणवत असून, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याची परिस्थिती आहे. दुष्काळाचे हे चित्र बदलण्यासाठी शासनाने विविध उपाययोजनांबरोबर गाव व परिसरातील पाणी साठवण क्षेत्राच्या दुरुस्तीबरोबर बंधाऱ्यांमध्ये साचलेला गाळ काढून साठवण क्षमता वाढवण्याचे काम लोकसहभागाद्वारे करण्याचा सपाटा लावला आहे. सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथेही माजी सरपंच संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठवडाभरापासून गाव व शिवारातील सर्वच नाले व बंधारे गाळमुक्त करण्याचे काम ग्रामस्थांच्या सहभागातून सुरू आहे. चिमट्याच्या मळ्यातील बंधाऱ्यात काम सुरू असताना सुमारे सहा-सात फूट गाळ काढून झाल्यावर मातीचा ओलावा जाणवू लागल्याने काम थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. काही वेळातच खोदलेल्या खड्ड्यात बऱ्यापैकी पाणी साठल्याचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा गाळ काढण्याचे काम सुरू केल्यानंतर याठिकाणी पाण्याचा झरा आढळून आला.
ही सुखद बातमी वाऱ्यासारखी चिंचोली परिसरात पसरताच चिमट्याच्या मळ्यातील बंधाऱ्यावर झरा पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली. तीव्र टंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत असताना हाती लागलेल्या या झऱ्यामुळे आश्चर्याचा सुखद धक्का बसल्याचे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून आले. या झऱ्यामुळे सध्या तरी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
परिसरातील सर्वच बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याचे काम सुरू असल्यामुळे बंधाऱ्यांची साठवण क्षमता वाढणार असून, सिंचन क्षेत्रात वाढ होऊन पाणी पातळी वाढण्याचे काम होणार आहे.
माजी सरपंच संजय सानप, सरपंच सुनीता सानप, उपसरपंच संगीता भोळे, पोलीसपाटील मोहन सांगळे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष राजू नवाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तू नवाळे, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ झाडे, नितीन आव्हाड, बाळू सानप, प्रवीण लांडगे, दौलत झाडे, प्रकाश नवाळे, नितीन नवाळे, नामदेव हुल्लळे, संदीप भाबड, शरद सानप, अशोक गिते आदिंसह ग्रामस्थ जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांसाठी परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Water foil found in the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.