पड रं पाण्या पड पड पाण्या.

By Admin | Updated: June 30, 2014 00:25 IST2014-06-29T22:18:21+5:302014-06-30T00:25:06+5:30

कोरड्या नभाचा अन् उसवलेल्या भुईचा मन सुन्न करणारा ‘रिपोर्ट’

Water falls under water. | पड रं पाण्या पड पड पाण्या.

पड रं पाण्या पड पड पाण्या.


स्पॉट : चांदवड
होरपळलेल्या जिवांना धास्ती
 जून महिना संपत आला तरी वरुणराजाचे आगमन नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले असून, अजून काही दिवसांत पावसाचे आगमन झाले नाही तर सन १९७२ च्या दुष्काळाची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. बळीराजा एकीकडे चिंताक्रांत झाला असून, दुसरीकडे पिण्याचे पाणी काही भागातून गेल्या मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात गायब झाले आहे. शेतकऱ्यांना संकटांना सामोरे जावे लागत असून, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, डाळींब बागांचे संकट व उशिरा झालेल्या खरिपाच्या पेरण्या यांसारख्या चक्रव्यूहाने बळीराजा चिंताग्रस्त आहे.
 सर्वत्र रोहिणी नक्षत्र गेले, मृगही गेले. आता आर्द्रा नक्षत्र लागून पाच दिवस उलटले तरी पावसाने चांदवड तालुक्यात हजेरी लावली नाही. गेल्या पाच-सहा महिन्यांत दररोज पावसाने हजेरी लावली, तर वर्षभर बेमोसमी पाऊस पडत होता. पिकांचे नुकसान केले. आता ऐन हंगामात पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे यावर्षी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. चांदवड तालुक्यातील अनेक जलाशये व पाणीसाठे असणारी धरणे व पाझर तलावांनी तळ गाठला आहे. पिण्यासाठीच अनेक भागांत पाणी नसल्याने ते शेतीसाठी कोठून मिळणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .
 दरम्यान, शेतकऱ्यांनी होती नव्हती ती पिके वाचविण्यासाठी विहिरीतील पाणी काढून पिकांना दिले. अनेक शेतकऱ्यांनी शेतात लहानमोठे प्लॅस्टिक तळे केले आहे, त्यांनीही आता तळ गाठला आहे. डाळींब व इतर बागांना तर शेतकऱ्यांनी स्वत:च्या विहिरीतील किंवा बोअरवेलमधील पाणी संपल्याने आता टॅँकरने विकत पाणी आणून पिके जगविण्याचा मार्ग पत्करला आहे. आर्द्रा नक्षत्र लागून चार ते पाच दिवस झाले मात्र पावसाचा मागमूसही नाही. त्यात उन्हाळ्यासारखे ऊन रखरखत आहे. सर्वत्र जळालेली पिके, काही ठिकाणी पेरणीसाठी भकास पडलेली जमीन, ओस माळराने, उघडे डोंगर, पाण्याने तळ गाठलेली धरणे, विहिरी यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. येत्या चार-पाच दिवसांत पाऊस पडला नाही तर पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त होणार आहे. ग्रामीण भागातील विहिरी, बोअरवेलने तळ गाठल्याने आता टॅँकरची संख्या वाढणार आहे. पाण्याच्या शोधात महिला, पुरुष, बालके वणवण फिरत आहेत.
स्पॉट : पेठ
विकतचे पाणी !
तब्बल महिन्याचा कालावधी उलटूनही वरुणराजा हजेरी लावत नसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट आहे. आधीच दुष्काळाच्या खाईत सापडलेला बळीराजा यामुळे मोठ्या संकटात सापडण्याची भीती आहे़ पेठ तालुक्यात काही ठिकाणी विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. पाऊस नसल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत़ शिवाय हाताला काम नसल्याने आकाशाकडे डोळे लावून बसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे़ तालुक्यातील आठ धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत चालल्याने जनावरांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटिल होत चालला आहे़ तालुक्यातील शंभर गावांना टंचाईच्या झळा बसत असताना, पाऊस लांबल्याने टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे़

स्पॉट : कळवण
बिकट वाट
अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकरी उद्ध्वस्त झाल्यानंतर खरीप हंगामात तरी पाऊस येईल अशी अपेक्षा लागून असलेल्या शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. तालुक्यातील चणकापूर धरणात १७, अर्जुन सागर (पुनद) धरणात ३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तालुक्यातील ११ लघुपाटबंधारे प्रकल्प कोरडेठाक झाले असून, परिस्थिती बिकट झाली आहे. शहरात पाणीटंचाई जाणवत नसली, तरी अन्य भागांत वाईट स्थिती आहे. शहरात अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. शहराला नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकल्प आटू लागल्याने ओतूर, गोबापूर, बोरदैवत, धार्डे दिगर, भांडणे, खिराड, मार्कंडपिंप्री प्रकल्पात मृतसाठा शिल्लक आहे. तालुक्यातील दहा नळपाणीपुरवठा योजना पूर्ण असून, ४१ योजना तात्पुरत्या स्वरूपात सुरु आहेत. त्यांची किरकोळ कामे अपूर्ण आहेत. २९ योजनांची कामे प्रगतिपथावर सुरु आहेत, तर ३५ योजनांची कामे तांत्रिक मान्यतेसाठी दाखल असल्याने सुरू झालेली नाहीत. धरण उशाशी असूनसुद्धा पुनद लाभक्षेत्रातील बंधारपाडा, औत्यापाणी, चोळीचा माळ, उंबरगव्हाण यांसह अन्य विविध विभागांतील आदिवासी बांधवांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते, हे सत्य नाकारता येत नाही.
स्पॉट : सटाणा
चिंताच चिंता
च् सटाणा तालुक्यातील अनेक भागांत पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणा आजही कोलमडल्या आहेत, तर हातपंपांवर महिलांची गर्दी वाढत आहे. नळांना आतापर्यंत पाणी येत होते. मात्र जलाशयातील पाण्याचा साठाच संपुष्टात आल्याने टंचाईच्या काळात तर पाणी मिळणे मोठ्या प्रमाणावर दुरापास्त होणार आहे. बागलाण तालुक्यातील अनेक प्रकल्पांनी आज तळ गाठल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
 जिल्ह्याच्या अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती आहे. पेरणी कशी करावी, असा गहन प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी पेरणी आतापर्यंत होऊन गेली होती. आता पावसाचे चिन्हच दिसत नसल्याने पेरणी कोणत्या भरवशावर करावयाची? अशी चिंता लागून आहे. व्यापारी वर्गाने बियाणे खते भरुन ठेवली. मात्र पाऊसच नसल्याने मागणी नाही. पावसाचे आमगन न झाल्यास सन १९७२ पेक्षा भयानक दुष्काळाचा सामना करावा लागेल, अशी भीती जुने जाणकार आजही व्यक्त करीत आहेत.

Web Title: Water falls under water.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.