कांद्यामुळे डोळ्यांत पाणी !
By Admin | Updated: August 23, 2015 23:45 IST2015-08-23T23:43:35+5:302015-08-23T23:45:20+5:30
कांद्यामुळे डोळ्यांत पाणी !

कांद्यामुळे डोळ्यांत पाणी !
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून बाजारात कांद्याचे दर कडाडल्याने सर्वसामान्यांसह हॉटेल व्यावसायिकांच्या डोळ्यांत पाणी तरळले आहे. या भाववाढीचा शहरातील हॉटेल्सना रोज प्रत्येकी दोन ते अडीच हजार रुपयांचा फटका बसत आहे. अनेक हॉटेलांत जेवणासोबत कांद्याऐवजी काकडी दिली जात आहे, तर गृहिणींचेही बजेट कोलमडले आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे कांद्याचे नुकसान झाले. त्यामुळे कांद्याचे उत्पादन कमी होऊन आवक घटल्याने भाव वाढले आहेत. महिनाभरापूर्वी घाऊक बाजारात २,७०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटल भावाने मिळणारा कांदा आता तब्बल पाच हजार ते पाच हजार सातशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही कांदा ५० ते ७० रुपये प्रतिकिलोने मिळत आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. साधारण एका मध्यम हॉटेलमध्ये दररोज ७० ते ८० किलो कांदा लागतो. विशेषत: शाकाहारी हॉटेल्समध्ये भाज्यांचा रस्सा हा कांद्यापासूनच तयार केला जातो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात कांदा लागतो. शिवाय पावभाजी, उत्तप्पा, डोसा, मिसळ यांसारख्या अनेक खाद्यपदार्थांसाठीही कांदा भरपूर लागतो. नाष्टा, जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना खाण्यासाठी कच्चा कांदाही द्यावा लागतो; मात्र दर भडकल्याने एका हॉटेलला कांद्यासाठी रोज सुमारे दोन ते अडीच हजार रुपये अधिक खर्च करावे लागत आहेत. काहींनी कच्चा कांदा देण्याऐवजी काकडी देणे सुरू केले आहे; मात्र पदार्थांचे दर वाढवलेले नाहीत. सदर वाढ काही दिवसांपुरतीच असून, तेवढ्यासाठी मेन्यूकार्ड बदलणे शक्य नसल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.
हॉटेल व्यावसायिकांसह नागरिकांचे बजेटही कोलमडले आहे. साधारणत: चार जणांच्या एका कुटुंबात आठवड्याला दोन ते अडीच किलो कांदा लागतो. सध्या एका कुटुंबाला आठवड्याला ७० ते ८० रुपयांचा फटका या भाववाढीमुळे सहन करावा लागत असून, त्यामुळे गृहिणी मेटाकुटीला आल्याचे चित्र आहे.
दरम्यान, नव्या कांद्याबाबतही अनिश्चितता आहे. एरवी शेतकरी नागपंचमीला कांद्याचे उळे टाकतात; मात्र यंदा पाऊसही लांबल्याने येणाऱ्या कांद्याला उशीर होणार आहे. दरवर्षी दिवाळीत येणारा कांदा दाखल होण्यासाठी डिसेंबर, जानेवारी उजाडणार असल्याने कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता कमीच आहे. कांद्याचे भाव वाढले असले, तरी लहान शेतकऱ्यांकडे मालच शिल्लक नसल्याने त्याचा त्यांना फायदा होत नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य ग्राहकांना मात्र दैनंदिन स्वयंपाकात कांदा वापरणे मुश्कील झाले आहे. (प्रतिनिधी)