धरणांमधून पाण्याचा विसर्ग
By Admin | Updated: November 2, 2015 22:56 IST2015-11-02T22:56:05+5:302015-11-02T22:56:44+5:30
सर्वपक्षीय नेत्यांचा विरोध : दारणा, मुकणे, कडवा व भावलीमधून चार हजार क्यूसेस

धरणांमधून पाण्याचा विसर्ग
घोटी : इगतपुरी तालुका धरणांच्या पाणीप्रश्नी सोमवारी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली. रविवारी रात्री दहा वाजेपासून दारणा धरणातून पाण्याच विसर्ग सुरू केला होता. त्यामध्ये रात्री दहाच्या दरम्यान दारणा धरणातून दोन हजार क्युसेस पाणी सोडले होते तर सोमवारी सकाळी दहा वाजता तीन हजार क्युसेस व त्यानंतर अकरा वाजता चार हजार क्युसेस पाणी पोलिसांच्या चोख बंदोबस्तात सोडण्यात आले होते.
दरम्यान, सोमवारी सकाळपासूनच सर्वच राजकीय पक्षांनी आपला ताफा दारणा धरणाकडे वळविला होता. यात प्रामुख्याने काँग्रेसच आमदार निर्मला गावित, विधानसभा अध्यक्ष भास्कर गुंजाळ, जिल्हा परिेषद सदस्य तथा नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अँड. संदीप गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गोरख बोडके यांनी सर्वप्रथम दरणाचे मुख्य अभियंता मिसाळ यांच्याशी चर्चा केली तसेच सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, कुलदीप चौधरी यांनी भेट देऊन आंदोलनाची दिशा ठरवली. मनसेचे उपजिल्हाप्रमुख रतनकुमार इचम यांनीदेखील यावेळी दारणा धरणावर भेट दिली. इगतपुरी तालुका भाजपा शिष्टमंडळानेदेखील पाण्याचा होत असलेला विसर्ग बंद करण्यासाठी प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे यांना निवेदन दिले. यावेळी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, भाजप नेते भाऊसाहेब धोंगडे, कैलास चौधरी हे उपस्थित होते.
दरम्यान यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने जरी पाणी सोडण्याचे केवळ आदेश जरी दिले असले तरी प्रत्यक्ष किती सोडावे हे न्यायालयाने म्हटलेले नसल्याने जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा याबाबत अंतिम आदेश येत नाही तोपर्यंत प्रशासनाने पाणी बंद करावे, अशी मागणी सिन्नरचे आ मदार राजाभाऊ वाजे यांनी दारणा धरणावर केली. काल मध्यरात्री दारणा धरणातून ४ हजार क्यूसेस, मुकणे धरणातून १ हजार क्यूसेस तर कडवा धरणातून ३ हजार क्यूसेस पाणी जिल्हाधिका-यांच्या आदेशाने सोडण्यात आले होते. सकाळी सोडलेल्या पाण्यास तालुक्यातून झालेला प्रखर विरोध बघता दारणा धरणातून २ हजार क्यूसेसने पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला होता, मात्र दुपारनंतर पुन्हा विसर्ग पूर्ववत करण्यात आला. सकाळ पासूनच दारणा, मुकणे या धरणांवर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे तसेच सत्ताधारी भाजपा आदी पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह शेतक-यांनी पाण्याच्या आवर्तनास विरोध करण्यासाठी एकच गर्दी केली होती.
या विरुध्द सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे जि प सदस्य गुळवे,बोडके यांनी सांगितले. त्यानंतर सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, तालुकाप्रमुख भगवान आडोळे, शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतक-यांचा ताफा दारणा धरणावर पाण्यास विरोध करण्यासाठी जमा वह्यायला सुरु वात झाली तशी प्रशासनाची धावपळ सुरु झाली. त्यानंतर आ राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली जमलेल्या शेतक-यांची बैठक
झाली.
या बैठकीत तालुक्यातील धरणांतुन जायकवाडीला सोडलेल्या पाण्यास प्रचंड विरोध करण्यात आला. अगोदर हक्काचे पाणी आरक्षित करून धरणांत ठेवा मगच उरलेल्या पाण्याचा इतरत्र विचार करावा अशी मागणी शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांनी केली. यावेळी माजी आ पांडुरंग गांगड, रतन जाधव, वसंतराव मुसळे, केरू देवकर, दत्तू पासलकर आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे आणि तहसीलदार महेंद्र पवार यांना नवेदन देण्यात आले. यावेळी प्रांतअधिकारी बाळासाहेब वाघचौरे यांनी हायकोर्टाची भूमिका स्पष्ट केली. या जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस उपअधीक्षक सी. देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, घोटीचे सहायक पालीस नि रीक्षकसुरेश मनोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)