पाणीकपातीचे संकट; फेरनियोजनाची शक्यता
By Admin | Updated: July 3, 2016 00:39 IST2016-07-03T00:35:13+5:302016-07-03T00:39:20+5:30
पाणीकपातीचे संकट; फेरनियोजनाची शक्यता

पाणीकपातीचे संकट; फेरनियोजनाची शक्यता
नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा १५ टक्के पाणीसाठा उरला असून, त्यातही महापालिकेचा आरक्षित पाणीसाठा अवघा २० ते २२ दिवस पुरेल इतकाच असल्याने प्रशासनाकडून पाणीकपातीसंदर्भात फेरनियोजनाचा विचार सुरू असून, पुढील आठवड्यात त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. फेरनियोजनात शहराला आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जाण्याची चर्चा आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ९१७ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिकेचे गंगापूर आणि दारणा धरण मिळून ३३८ दलघफू पाणी आरक्षण शिल्लक आहे. त्यात दारणा धरणातून पाणी उचलणे शक्य नसल्याने शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनीही दारणातून उपसा थांबविण्याचे आदेश दिले असल्याने महापालिकेची सारी भिस्त गंगापूर धरणावरच आहे. दारणातील १३४ दलघफू आरक्षण शिल्लक आहे. तर गंगापूरमधून अवघे २०४ दलघफू पाणी आरक्षण शिल्लक आहे. त्यामुळे प्रतिदिन १० दलघफू पाण्याची उचल लक्षात घेता अवघे वीस दिवस पुरेल इतके पाणी आरक्षण शिल्लक आहे. सदर पाणी २० ते २२ जुलैपर्यंत पुरवता येईल, परंतु पुढे उर्वरित पाण्यातून उपसा करावा लागणार आहे. त्यासाठी शासनाची परवानगी लागणार आहे. तत्पूर्वी, आहे ते आरक्षित पाणी ३१ जुलैपर्यंत पुरविण्यासाठी मनपाने पाणीकपातीसंबंधी फेरनियोजनाचा विचार सुरू केला आहे. शहरात जून महिन्यात पावसाने पूर्णपणे पाठ फिरविली तर गेल्या दोन दिवसांपासून केवळ रिमझिम स्वरूपात पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरावर जलसंकट घोंघावत आहे. उपलब्ध पाणीसाठ्यातील बचतीकरिता आठवड्यातील दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत आठवड्यातील दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. (प्रतिनिधी)