जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

By Admin | Updated: April 24, 2016 10:11 IST2016-04-23T23:41:46+5:302016-04-24T10:11:12+5:30

गुरुकृपानगर परिसरात तब्बल १८ दिवसांनी नळाला पाणी आले. पण मुख्य जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटलेली असल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.

Waste of thousands of liters of water by splitting the water channel | जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

 नांदगाव : शासकीय स्तरावर पाणी वाचविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारांनी नागरिकांना आवाहन केले जात असले व दंडात्मक कारवाईची तरतूद असली तरी, नांदगाव नगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदोष यंत्रणेतून वाहून जाणाऱ्या पाण्यासाठी त्यांच्यावर कोणी कारवाई करावी? याबाबत गुरुकृपानगरातील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले आहे.
गुरुकृपानगर परिसरात तब्बल १८ दिवसांनी नळाला पाणी आले. पण मुख्य जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटलेली असल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. काही ठिकाणी गरजेपोटी नागरिकांनी रांग लावून वाया जाणारे पाणी उपसून भरले.
विशेष म्हणजे नदीतून जाणारी जलवाहिनी वारंवार फुटते म्हणून, नवीन सुरक्षित वाहिनी नदीच्या पुलावरून टाकण्यात आली. तर तीदेखील फुटल्याने बरेचसे पाणी नदीत वाहून गेले.
जेटीके इंग्लिश मीडियम स्कूलच्या पाठीमागे फुटलेल्या वाहिनीतून वाहणाऱ्या पाण्याच्या ओहोळात लहान मुलांनी पाण्यात खेळण्याचा आनंद घेतला तर तिथून ४० ते ५० फूट अंतरावर जमिनीतून पाणी वर येत होते. त्यापुढे पुढच्या ४० ते ५० फुटांवर गळतीमधले पाणी भांड्याकुंड्यांनी भरले गेले. त्याहीपुढे पाणी गळतच होते.
एरवी पाण्याच्या अडचणींसाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कोर्टात, चेंडू टोलविणाऱ्या नगरपालिकेस अद्याप गुरुकृपा नगरातील पाणीपुरवठ्याचे सूत्र सापडलेले नाही. शहरात ३५०० कनेक्शन्स आहेत. एकूण ३९ भाग आहेत. येथे केवळ १९० नळ कनेक्शन्स आहेत आणि पाणीपुरवठ्याचे आठ भाग आहेत. त्यांना १८ ते २० तास पाणीपुरवठा करावा लागतो. या वेळात कितीतरी पाणी वाहून जाते. कोणाच्या बगिच्याला तर कोणाला गाड्या धुण्यासाठी मनमुराद पाणी उपलब्ध होते. लातूर येथे तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या प्रशासनास तहानलेल्या नागरिकांना नियंत्रित करण्यासाठी १४४ कलम लागू करावे लागले. पण पाण्याची कृत्रिम टंचाई, योजना राबविणाऱ्यांच्या चुकांमुळे निर्माण होत असेल तर कोणते कलम लावावे याची चर्चा शहरातील नागरिक करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Waste of thousands of liters of water by splitting the water channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.