चणकापूरमधून जलवाहिनी जाऊ देणार नसल्याचा इशारा
By Admin | Updated: October 27, 2015 23:09 IST2015-10-27T23:08:35+5:302015-10-27T23:09:07+5:30
चणकापूरमधून जलवाहिनी जाऊ देणार नसल्याचा इशारा

चणकापूरमधून जलवाहिनी जाऊ देणार नसल्याचा इशारा
कळवण : चणकापूर धरणातून तळवाडे साठवण तलावापर्यत जलवाहिनी टाकून पाणी नेऊन मालेगावचा पाणी प्रश्न सोडविण्याचा सरकारचा डाव कळवण तालुक्यातील शेतकरी यशस्वी होऊ देणार नाही. तालुक्यातून जलवाहिनी जाऊ देणार नाही असा इशारा जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी दिला आहे.
याबाबत महसूल आयुक्त एकनाथ डवले व जिल्हाधिकारी देवेंद्र कुशवाह यांना निवेदन दिले आहे. सरकारने पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी निर्मल योजनेत मालेगाव शहराचा समावेश करून एक हजार कोटी रु पयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेअंतर्गत चणकापूर ते तळवाडे साठवण बंधारा अशी ६९ किमी लांबीची जलवाहिनी टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला असून हा निर्णय शेतकरी बांधवाना उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे चणकापूरमधून जलवाहिनी जाऊ देणार नाही असा इशारा पवार यांनी दिला आहे. मालेगाव महानगरपालिका व युती शासन कोट्यवधी रुपये खर्च करून चणकापूर धरणातून थेट मालेगाव पर्यंत पाइपलाइन करण्याचा अट्टहास करीत आहे. चणकापूर धरणातील पाण्यावर व गिरणा नदीला येणाऱ्या आवर्तनावर कसमा भागातील चारही तालुके अवलंबून आहेत. त्याशिवाय हे धरण शेतीसाठी बांधण्यात आले आहे. (वार्ताहर)