वाकी खापरी धरणाचे काम बंद पाडले
By Admin | Updated: April 11, 2016 22:48 IST2016-04-11T22:48:05+5:302016-04-11T22:48:54+5:30
शेतकरी संतप्त : संपादित केलेल्या गावांचे पुनर्वसन न करता काम केल्याचा आरोप; विविध मागण्या प्रलंबित

वाकी खापरी धरणाचे काम बंद पाडले
घोटी : इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण न झाल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी धरण क्षेत्रात जाऊन अंतिम टप्प्यात सुरू चालू असलेले काम बंद पाडले. यावेळी शेतकऱ्यांनी ठेकेदारास यापुढे काम न करण्याच्या सूचना देतानाच साधनसामग्री हलविण्याचा इशारा दिला. आंदोलनाचे नेतृत्व धरणग्रस्त कृती समितीचे नेते रतनकुमार इचम व लहानू हिंदोळे यांनी केले. शेतकऱ्यांच्या आक्रमकतेपुढे नमते घेत ठेकेदाराने धरणाचे काम बंद केले.
वाकी खापरी धरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, शासनाने या धरणासाठी संपादित केलेल्या गावांचे कोणतेही पुनर्वसन न करता घाईगर्दीत काम उरकण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याचबरोबर शासनाच्या वतीने प्रकल्पग्रस्तांना पंधरा मूलभूत सुविधा देणे गरजेचे असून, या सुविधा दिल्यानंतरच धरणाचे काम पूर्ण करण्यात येते;
परंतु या बाबीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने या भागातील धरणग्रस्त शेतकरी संतप्त झाले आहेत. (वार्ताहर)