मालेगावकरांना प्रतीक्षा नवीन गिरणा पुलाची
By Admin | Updated: July 6, 2014 00:09 IST2014-07-05T22:06:23+5:302014-07-06T00:09:42+5:30
मालेगावकरांना प्रतीक्षा नवीन गिरणा पुलाची

मालेगावकरांना प्रतीक्षा नवीन गिरणा पुलाची
मालेगाव : शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या येथील जुन्या व अरुंद अशा गिरणा पुलावरील वाहतूक ही दिवसेंदिवस धोकेदायक, वाहतूक कोंडी करणारी व वेळकाढू ठरत आहे. दुसरीकडे या पुलाला समांतर अशा नवीन पुलाचे बांधकाम शासकीय क्लिष्ट प्रक्रियेमुळे दिवसेंदिवस लांबणीवर पडत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर येथील नवीन पुलाच्या कामाच्या भूमिपूजनाची शोबाजी व पत्रकबाजी करणाऱ्यांनी या पुलाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी सर्वसामान्य मालेगावकर जनता व प्रवासीवर्गाकडून करण्यात येत आहे.
मालेगावहून पुणे, नाशिक, मुंबई ये-जा करण्यासाठी शहराच्या वेशीवर गिरणा नदीवर ब्रिटिशकालीन गिरणा पूल आहे. या पुलाने शंभरी गाठली आहे. सदर जुन्या गिरणा पुलाची अवस्था बिकट झाली आहे. तरीही या पुलाचा वापर अद्यापही सुरू आहे. या पुलावर दोन्ही बाजूने वाहने आल्यास त्वरित वाहतूक कोंडी व लहान-मोठे अपघात होतात. पुलाचे संरक्षक कठडेही काही ठिकाणी तुटले आहेत.
शहर तालुकावासीयांतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून नवीन पुलाची मागणी करण्यात येत होती. त्यास महत्प्रयासाने मान्यता मिळाल्यानंतर गेल्यावर्षी या पुलाच्या कामास हिरवा कंदील मिळाला. नदीपात्रातून नवीन पुलासाठी सर्वेक्षण करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्याअगोदर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाभरात उद्घाटने, भूमिपूजन करण्याचा सपाटा लावला होता. त्यात नांदगाव व मालेगाव तालुक्यातील अनेक विकासकामांचा समावेश होता. त्याअंतर्गत पूल उभारणी कामाचे भूमिपूजन करण्यात आले. जुन्या पुलाच्याच पुढ्यात कोनशीला उभारली. मात्र त्यानंतर कुठलीही शासकीय यंत्रणा येथे फिरकली नाही. एवढ्या घाईने भूमिपूजन झाल्यावर पुलाचे काम त्वरित सुरू होईल, असे शहरवासीयांचे स्वप्न होते; परंतु कासवगतीने पुलाच्या असंख्य फायलींचा प्रवास सुरू आहे. यात पुलाची डिझाईन, निविदा प्रक्रियेचा समावेश आहे. विविध बांधकाम कंपन्यांशी ‘चर्चेचे गुऱ्हाळ’ सुरू असल्याचीही चर्चा आहे.
सध्या मोतीबाग नाका ते जुन्या गिरणापुलापर्यंत दोघेही बाजूने रस्त्याचे रुंदीकरण सुरू झालेले
आहे.
तांत्रिकदृष्ट्या जुन्या गिरणा पुलाचे वयोमान कधीच संपले असल्याने त्याला समांतर असा नवीन पूल बांधण्यासाठी अजून किती प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न सर्वसामान्य मालेगावकर व जनतेकडून करण्यात येत आहे.