ईश्वराच्या नमस्कारासाठी वृक्षमंदिर

By Admin | Updated: July 1, 2016 00:20 IST2016-06-30T23:45:32+5:302016-07-01T00:20:20+5:30

धनश्रीदीदी : जाटपाडे येथे बालतरूंची प्रतिष्ठापना

Vrubhvandir for the salutation of God | ईश्वराच्या नमस्कारासाठी वृक्षमंदिर

ईश्वराच्या नमस्कारासाठी वृक्षमंदिर

 

संतोष कांबळे  जाटपाडे
ईश्वराच्या सर्वव्यापकत्वाला नमस्कार करण्याची जागा म्हणजे वृक्षमंदिर होय, असे प्रतिपादन स्वाध्याय परिवाराच्या धनश्रीदीदी तळवलकर यांनी जाटपाडे (ता. मालेगाव) येथे केले. नांदगाव-मालेगाव मार्गावरील जाटपाडे गावाच्या हद्दीतील रामवाडी शिवारात धनश्रीदीदींच्या हस्ते लाखो स्वाध्यायी पूजकांच्या उपस्थितीत बालतरुंची प्रतिष्ठापना करण्यात आली.
लक्षावधी स्वाध्यायींनी सोबत आणलेल्या बालतरुंचे यावेळी रोपण करण्यात आले. पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारात मंदिरातील मूर्तींची करतात तशीच विविध प्रकारच्या बालतरूंची प्रतिष्ठापना यावेळी जमिनीवर केली. यामध्ये आंबा, पेरू, चिकू, सीताफळ, चिंच आदि वृक्षांचा समावेश आहे.
(पान ७ वर)
आदिम काळातील मानव हा जोपर्यंत अस्थिर होता तोपर्यंत त्याची पशुसारखी अवस्था होती; मात्र जेव्हापासून त्याने कृषी संस्कृती अंगीकारली तेव्हापासून त्याच्या सर्वांगिण विकासास सुरूवात झाली. म्हणूनच मानवोत्थानाच्या दृष्टीने स्वाध्याय परिवाराचे प्रमुख दिवंगत प. पू. पांडूरंग शास्त्री आठवले यांनी यापूर्वी सुरू केलेले हिरामंदिर, योगेश्वर भावकृषी, मत्स्यगंधा आदि प्रयोग स्वाध्याय परिवार पुढे नेत आहे, असे धनश्री दिदी म्हणाल्या.
दिदींच्या हस्ते बालतरूंची प्रतिष्ठापना होत असताना नारायणोपनिषद् व श्रीसुक्ताचे मंत्रोच्चारण परिसरात मंगलता व धीरगंभीरता निर्माण करीत होते. यावेळी स्वाध्याय परिवाराची श्री योगेश्वराची आरतीही म्हणण्यात आली. बालतरू रोपणानंतर झालेले दिदींचे प्रवचन हे स्वाध्याय प्रेमींसाठी एक पर्वणी होती.
आपल्या अमोघ वाणीतून श्रीमद्भगवद्गीतेतील वेगवेगळे धार्मिक दाखले देत व श्लोक उच्चारत दिदींनी स्वाध्याय परिवाराने चालवलेले हे वृक्षमंदिर निर्माणाचे कार्य आजचे कार्य नसून वैदिक काळापासून सुरू असलेले पण मध्यंतरीच्या कालावधीत विस्मृतीत गेलेले एक ईश्वराचेच कार्य स्वाध्याय परिवार पुन:श्च करीत असल्याने सांगितले. तसेच प. पू. पांडूरंग शास्त्री आठवलेंचा दाखला देत त्या म्हणाल्या की, दादांच्या मनाप्रमाणे आपण जे कार्य करीत आहोत ते जुनेच आहे. पण मध्यंतरी ते विस्मृतीत गेले वा कुणीतरी सोडून दिले म्हणून मानवोत्थानाच्या भूमिकेतून व मानवविकास साधण्यासाठी ते कार्य करणे गरजेचे आहे, असेही दिदी पुढे म्हणाल्या.
स्वाध्याय परिवाराची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, आता ठिकठिकाणी वनमहोत्सव होतात. हरीत मुंबईसारखी पर्यावरण विषयक उपक्रमांची अंमलबजावणीही होते. पर्यावरणपूरक कामे ठिकठिकाणी होत आहेत; परंतु आता गरज निर्माण झाली म्हणून ही कामे आपल्याला करायची असतील तर अशी अप्पलपोटेपणाची स्वाध्याय परिवाराची शिकवण नसून मानवाला विकासाकडे नेणारे एक माध्यम म्हणून किंवा मला गरज नसली तरी वैश्विक कल्याणासाठी म्हणून स्वाध्याय परिवाराने हे काम उभारले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मिल्टन या जगप्रसिद्ध तत्ववेत्याचे उदाहरण देताना त्यांनी ‘गॉड ईस नो व्हेअर’ हे वाक्य ‘गॉड ईज नाऊ हेअर’ असे सांगितले. याचाच अर्थ देवाचा साक्षात्कार हा अनुभवायचा असेल तर तो वृक्षातही अनुभवता येतो व त्याच्याद्वारे मिळणारी सावली, फळे, फुले हा ईश्वरी प्रसाद आहे, अशी अनुभूती घेता येऊ शकते, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
शेवटी कृषी संस्कृती जपणाऱ्या शेतकऱ्याला ईश्वराचा सच्चा पाईक संबोधून शेतकऱ्याची ईश्वरावर श्रद्धा असल्याशिवाय तो शेती करुच शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. शेतकरी हा पावसासाठी आकाशाकडे याचना करतो. नभातून मिळणाऱ्या पाण्यावर शेती करतो व जमिनीतून धनधान्य मिळवितो याचाच अर्थ तो पंचमहाभूतांकडून हा प्रसाद मिळवितो व ईश्वरी अस्तित्व कृतीतून मान्य करतो म्हणून शेतकरी ईश्वराचा खरा श्रद्धाळू भक्त आहे व हीच कृषी संस्कृती स्वाध्याय परिवार वृक्षमंदिराच्या माध्यमातून पुढे नेत आहे, असे त्या म्हणाल्या.

Web Title: Vrubhvandir for the salutation of God

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.