‘परिवर्तना’वर विश्वास ठेवणारा मतदार !
By Admin | Updated: June 27, 2014 00:19 IST2014-06-26T21:29:32+5:302014-06-27T00:19:36+5:30
‘परिवर्तना’वर विश्वास ठेवणारा मतदार !

‘परिवर्तना’वर विश्वास ठेवणारा मतदार !
कोणत्याही पक्षाची सातत्याने पाठराखण न करणाऱ्या मालेगाव मध्य मतदारसंघातील मतदारांवर जाती पातीच्या राजकारणासह दखनी-मोमीन वाद आणि धार्मिक प्रभाव पडतोच. साहजिकच त्यामुळे विजयाची खात्री असणाऱ्या भल्या भल्यांना धोबीपछाड देण्याची परंपराही या मतदारांनी निर्माण केली आहे.
लोकसभा निवडणुकीत मालेगाव मध्यमधील कॉँग्रेसच्या परंपरागत एकगठ्ठा मुस्लीम मतांच्या भरवशावर एकदा पराभूत होऊनही दुसऱ्यांदा मैदानात उतरलेल्या अमरिश पटेल यांना पुन्हा एकदा मतदारांनी दणका दिल्याने केवळ ‘मुस्लीम’ म्हणून एकगठ्ठा मते कुणा एका पक्षाला मिळतील हा भ्रम आता नाहीसा झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून मालेगावच्या मुस्लिमांमध्ये शिक्षणाचे प्रमाणही वाढत असून, इथला मतदार जागरूक झाला आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाला हा मतदार जवळ करील याबाबत आज तरी साशंकता आहे.
गेल्या काही वर्षांपासून कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मालेगाव मध्य मतदारसंघात ‘धार्मिक’ प्रभाव असणाऱ्या नेत्यांनी विशेषत: मौलानांनी नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला. सलग दहा वर्षे सत्ता राहिलेल्या कॉँग्रेसला गेल्या वेळी मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माइल यांच्या रूपाने ‘ब्रेक’ लागला. ‘विकास’कामांचा पाढा वाचूनही मतदार भुलला नसला तरी यावेळी मात्र गेल्या पाच वर्षांत ‘जनसुराज्य’ पक्षातर्फे विजयी झालेल्या मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माइल यांनी केलेल्या कामांचा हिशेबही त्यांना द्यावा लागणार आहे.
राज्यात सत्तेवर असलेल्या कॉँग्रेसला यावेळी मालेगाव ‘मध्य’मध्ये मात्र अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. गेल्या वेळी विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होऊन मालेगाव ‘मध्य’ आणि ‘बाह्य’ असा बदल करण्यात आला. त्यात ‘मध्य’ मतदारसंघात असलेल्या ‘मराठी’ मतदारांना ‘बाह्य’ मतदारसंघात जोडले गेल्याने त्याचाही परिणाम गेल्या निवडणुकीत दिसून आला होता.
विकासाच्या विरोधात ‘भाईचारा’!
गत विधानसभा निवडणुकांपूर्वी महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने परंपरागत मालेगाव ‘मध्य’ विधानसभा मतदारसंघात ‘सत्ता’ मिळविणाऱ्या कॉँग्रेस-जनता दल यांच्यासमोर ‘तिसरा महाज’च्या रूपाने प्रबळ स्पर्धक उभा राहिला होता. आता ‘धार्मिक’ क्षेत्रातून समाजकारणात प्रवेशासाठी उत्सुक असलेल्या मौलानांमधून मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी महापालिकेसह शहरावर चांगलीच पकड घेतल्याने ‘जनसुराज्य’ पक्षाकडून लढत मौलाना मुफ्ती मोहंमद यांनी कट्टर राजकीय स्पर्धक असलेल्या कॉँग्रेसच्या शेख रशीद यांना जबरदस्त टक्कर देत सत्ता आपल्या हातात मिळविली.
वास्तविकता तिसरा महाज पुढे आल्याने जनता दलाचा प्रभावही ओसरला होता; तर त्यामुळे कॉँग्रेसच्या शेख रशीद यांच्या विरोधात जनसुराज्यचे मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माइल यांच्यातच चुरशीची लढत झाली. दोन वेळा आमदारकी भुषविलेल्या शेख रशीद यांना निसटता पराभव पहावा लागला. दखनी-मोमीन हा मुद्दादेखील उफाळून आल्याने त्याचा फटका रशीद शेख यांना बसला.
मोदी लाट निष्प्रभ
आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वत्र ‘मोदी’ लाट असताना मालेगाव ‘मध्य’ मतदारसंघात मात्र त्याचा फारसा प्रभाव जाणवला नाही. कॉँग्रेससह इतर राजकीय पक्षांनीही भाजपाविरोधात ‘काहूर’ उठवत कॉँग्रेस उमेदवार अमरिश पटेल यांचा प्रचार केला. पटेल यांना मात्र मालेगाव मध्य मतदारसंघात चांगले मतदान होऊनही ते पराभूत झाले.
अनेक वर्षे ठराविक व्यक्ती किंवा पक्षाला वारंवार संधी देणाऱ्या मतदारांची मानसिकता आता बदलली आहे. त्यामुळे गेल्या वेळी असलेल्या पक्षाला याही वेळी संधी मिळेलच याची शक्यता नाही. आता मतदार विकासकामे, व्यक्ती, पक्ष न पाहता त्या वेळच्या परिस्थितीनुरूप बदलत आहे. शहरात धार्मिक नेत्यांचा असलेला प्रभाव पाहता मतदार आपली भूमिका नेहमीच बदलत आला आहे किंबहुना त्यामुळेच समाजवादी पक्षानेही आपली पाळेमुळे ‘मध्य’ मतदारसंघात रोवण्याचा प्रयत्न करून त्यात त्यांना यश आले नाही. परिणामी त्यांना लोकसभेसाठी प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्या तुलनेत ‘मध्य’ मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसने गेल्या पाच वर्षांत चांगले काम उभे केले आहे. कॉँग्रेस-राकॉँ यांची युती टिकली, तर त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होईल अन्यथा दोन्ही पक्षांनी विधानसभेसाठी ‘स्वतंत्र’ उमेदवार दिले तर मात्र पुन्हा तिसरा पक्ष बाजी मारण्याची शक्यता अधिक आहे.
युतीची कसरतच
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मात्र या भागात फारशी तयारी नाही. त्यांना उमेदवार उभा करताना तो मिळविणे कठीण असल्याने स्वत: शहर अध्यक्षच विधानसभेसाठी निवडणूक मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तशीच काहीशी परिस्थिती शिवसेनेची आहे. ‘मध्य’ मतदारसंघात सेनेलाही उमेदवार मिळविण्यासाठी सर्कस करावी लागणार आहे. अर्थात ‘मध्य’ मतदारसंघातली जागा ‘भाजपा’ची असल्याने शिवसेना या भागातून उमेदवार देण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळे युतीला ‘मध्य’ऐवजी ‘बाह्य’ मतदारसंघातच आपली ‘शक्ती’ पणाला लावावी लागणार आहे.
कॉँग्रेसची दोन वेळा आमदारकी भुषविलेले शेख रशीद यावेळी उमेदवारी करण्याची शक्यता तशी कमी आहे. कारण रशीद शेख यांचे पुत्र माजी महापौर आसीफ शेख गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत. त्यासाठी मुस्लीम बेरोजगारांना नोकरीत आरक्षण मिळावे यासाठी पदयात्रा काढून समाजात आपण सक्रिय असल्याचा संदेशच जणू त्यांनी आपल्या मतदारांना दिला आहे.
काय राहणार चित्र?
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये देखील मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचाच प्रभाव राहण्याची शक्यता आहे. दखनी-मोमीन वादाचा मुद्दा पुन्हा उफाळून त्याचा फायदा मौलांना यांना होण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय कॉँग्रेसचे माजी आमदार शेख रशीद यांचे चिरंजीव आसीफ शेख हे कॉँग्रेसतर्फे विधानसभेसाठी मैदानात उतरत असतानाच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे
युनूस ईसा यांचे पुत्र माजी महापौर मालिक शेखदेखील मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
मालेगाव मध्य मतदारसंघात मालेगाव महापालिकेची हद्द वाढल्यानंतर अनेक प्रश्न आजही
तसेच आहेत. हद्दवाढीनंतर मालेगाव शहरात समाविष्ट झालेल्या गावात आजही ‘विकास’कामे पोचली नाहीत. कोणतेही रस्ते नाहीत, पाण्याची व्यवस्था ‘चालू’
आहे. गटारी, आरोग्य यांच्याही समस्या जैसे थे आहेत. वास्तविक महापालिकेत आमदार मौलाना
मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्या ‘तिसरा महाज’शी
युती करून कॉँग्रेसचा महापौर आहे. कॉँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराच्या घरातील सदस्य महापौर असल्याने त्यांना केलेल्या कामांचा पाढा मतदारांसमोर वाचावा लागणार आहे. असे असले तरी मनपात सत्तेत असणारे दोन विरोधक विधानसभा निवडणुकीत परस्पर विरोधात उभे राहिल्यानंतर कोणते प्रश्न उपस्थित करतील यावरही बरेच काही अवलंबून आहे.