विंचूर येथे ग्रामसुरक्षा दलाची बैठक
By Admin | Updated: July 30, 2014 00:21 IST2014-07-29T22:29:52+5:302014-07-30T00:21:05+5:30
विंचूर येथे ग्रामसुरक्षा दलाची बैठक

विंचूर येथे ग्रामसुरक्षा दलाची बैठक
विंचूर : येथे ग्रामसुरक्षा दलाची बैठक उत्साहात पार पडली. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप आटोळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, गावात शांतता राखण्यासाठी ग्रामसुरक्षा दलासह नागरिकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात वाडी वस्त्यांवरील गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत सातव्या वर्षात गावपातळीवर ग्रामसुरक्षा दल स्थापना करण्यात आली आहे. या दलामुळे पोलीस यंत्रणेला अतिरिक्त कुमक उपलब्ध झाली आहे. गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असतील तरच गावात लक्ष्मी नांदेल, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी पंचक्रोशितील सरपंच व ग्रामसुरक्षा दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
परिसरात गणेशोत्सवासह आगामी विधानसभा निवडणूक शांततेत व्हाव्यात यासाठी बैठका आयोजित केल्या जात आहेत. गावाच्या सुरक्षेसाठी १८ ते ३५ वर्ष वयोगटातील युवकांचे ग्रामसुरक्षा दल कार्यरत ठेवल्यास चोऱ्या, लूटमार होणार नाहीत. त्यासाठी सर्वांनी लक्ष देऊन गावातील शांतता अबाधित ठेवा, असे आवाहन यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी केले. यावेळी उपस्थितांना नागरिकांनी सुरक्षिततेसाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहितीपत्रके दिली. परिसरातील नागरिकांनी आपल्या गावातील समस्या पोलीस प्रशासनापुढे मांडल्या असता त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी संदीप आटोळे यांनी दिल्या. याप्रसंगी विंचूरचे सरपंच अविनाश दुसाने, विष्णूनगरचे सरपंच किशोर मवाळ, धारणगाव वीरचे पोलीस पाटील विजयकुमार गंभीरे, सरपंच ज्ञानेश्वर गंभीरे, देवगाव सरपंच सुरेंद्र अढांगळे, डोंगरगावचे सरपंच बन्सी नागरे, कानळद सरपंच तानाजी जाधव यांसह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर.टी. तांदळकर, एल.के. धोक्रट, सूरज मेढे, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष प्रदीप तिपायले, विंचूर ग्रामपालिकेचे सदस्य देवीसिंग परदेशी, नीलेश गायकवाड, रणजीत गुंजाळ, महेंद्र पुंड, प्रकाश काळे, दीपक राऊत व परिसरातील ग्रामसुरक्षा दलाचे प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.