गणेशोत्सव मंडळाकडून ग्रामस्वच्छता
By Admin | Updated: August 13, 2014 00:44 IST2014-08-12T22:11:12+5:302014-08-13T00:44:56+5:30
गणेशोत्सव मंडळाकडून ग्रामस्वच्छता

गणेशोत्सव मंडळाकडून ग्रामस्वच्छता
नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील लोकनेते आप्पासाहेब दिघोळे कला, क्रीडा व सांस्कृतिक गणेशोत्स मंडळाच्या वतीने तरुणांनी श्रमदानातून ग्रामस्वच्छता करण्यात आली.
परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम तणपोशा पावसामुळे गल्लोगल्ली गाजरगवतासह विविध उपद्रवी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे गावातील अंतर्गत रस्त्यांवर पायी चालता येत नाही. तसेच घरांच्या परिसरात गवत व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गणेशोत्सवासह विविध सणांच्या पार्श्वभूमीवर येथील लोकनेते आप्पासाहेब दिघोळे कला, क्रीडा मंडळाच्या वतीने गावात स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी मंडळाच्या वतीने येथील मारुती मंदिरात घेण्यात आलेल्या बैठकीत गावात तरुणांच्या श्रमदानातून गावात स्वच्छता करण्याचे ठरविले. यावेळी गणोशोत्सव साजरा करण्यासाठी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ग्राम स्वच्छतेवरही चर्चा करण्यात आली.
गावातील गाजरगवतासह विविध उपद्रवी वनस्पती काढून घाणीचे साम्राज्य हटविण्यासाठी गाव स्वच्छ करण्याचे ठरवून त्या कामास शनिवारपासून प्रारंभ करण्यात आला. स्वच्छता करण्यात आलेल्या गल्ल्यांमध्ये कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ चेवले, प्रवीण दिघोळे, सुयोग दिघोळे, मंगेश गिते, अविनाश गिते, नितीन दिघोळे, अंबादास केदार, तुषार गिते, प्रकाश दिघोळे, प्रवीण मोहिते आदिंसह मंडळाचे कार्यकर्ते स्वच्छता मोहिमेच्या श्रमदानात सहभागी झाले होते. (वार्ताहर)