विजया राजाध्यक्ष यांना जनस्थान पुरस्कार

By Admin | Updated: January 20, 2017 01:32 IST2017-01-20T01:32:12+5:302017-01-20T01:32:34+5:30

कुसुमाग्रज प्रतिष्ठान : २७ फेब्रुवारीला वितरण

Vijaya Raja Prakash janasthan award | विजया राजाध्यक्ष यांना जनस्थान पुरस्कार

विजया राजाध्यक्ष यांना जनस्थान पुरस्कार

 नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका व समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांना घोषित झाला आहे. मुंबई आणि नाशिक येथे प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली.
कविवर्य कुसुमाग्रजांच्या संकल्पनेतून दिला जाणारा हा पुरस्कार वर्षाआड दिला जातो. यंदा या पुरस्कारासाठी विजया राजाध्यक्ष यांच्या नावावर निवड समितीने शिक्कामोर्तब केले. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी महाकवी कालिदास कलामंदिरात सन्मानपूर्वक विजया राज्याध्यक्ष यांचा गौरव केला जाणार आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर ठसा उमटविणाऱ्या तसेच मराठी भाषेतून गौरवास्पद लेखन करणाऱ्यास हा पुरस्कार दिला जातो.


मुंबई येथे सतीश तांबे, दासू वैद्य, रेखा इनामदार साने, मोनिका गजेंद्र गडकर आणि अनुपमा उजगरे यांच्या निवड समितीने राजाध्यक्ष यांची निवड केल्याचे प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे व विश्वस्त अरविंद ओढेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यापूर्वी जनस्थान पुरस्काराने विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, इंदिरा संत, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, श्री. ना. पेंडसे, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, बाबुराव बागुल, ना. धों. महानोर, महेश एलकुंचवार, भालचंद्र नेमाडे आणि अरुण साधू यांना गौरविण्यात आले आहे.
विजया राजाध्यक्ष या साहित्य वर्तुळात कथाकार आणि समीक्षक म्हणून परिचित आहेत. मीरज येथे जन्मलेल्या राजाध्यक्ष यांनी मुंबईत एल्फिस्टन महाविद्यालयात मराठीचे अध्यापक म्हणून तर एसएनडीटी विद्यापीठात विभाग प्रमुख म्हणून काम बघितले आहे. कथाकार आणि समीक्षक म्हणून त्या ख्यातनाम असून त्यांचे अधांतर, विदेही, अनोळखी, अकल्पित, अखेरचे पर्व, उत्तरार्ध असे एकूण १९ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. तरल आणि काव्यात्मशैली ही त्यांच्या कथांची वैशिष्ट्ये असून, समीक्षक या नात्यानेही त्यांची कामगिरी उल्लेखीय आहे. कवीतारती, जिव्हार स्वानंदाचे, आदिमाया, करंदीकरांचे समग्र लघुनिबंध ही त्यांची समिक्षात्मक पुस्तके असून ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’ या त्यांच्या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला आहे. सन २००० मध्ये इंदूर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.

Web Title: Vijaya Raja Prakash janasthan award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.