विधानसभा निवडणूक : मालेगाव, चांदवड, कळवण, नांदगाव येथे उमेदवारी अर्जांची छाननी
By Admin | Updated: September 29, 2014 22:34 IST2014-09-29T22:34:29+5:302014-09-29T22:34:50+5:30
१७ उमेदवारांचे अर्ज अवैध

विधानसभा निवडणूक : मालेगाव, चांदवड, कळवण, नांदगाव येथे उमेदवारी अर्जांची छाननी
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांच्या समोर छाननी करण्यात आली. वेगवेगळ्या त्रुटी असलेले अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरविले. चांदवडमधून सात, मालेगावमधून तीन, कळवणमधून चार तर नांदगाव येथे तीन असे एकूण १७ उमेदवारी अर्ज वेगवेगळ्या कारणांवरून अवैध ठरविण्यात आले. अर्ज माघारीनंतरच चित्र स्पष्ट होईल.
चांदवड : चांदवड-देवळा मतदारसंघात सात उमेदवारांचे अधिकृत एबी फॉर्म नसल्याने सात अर्ज अवैध, तर १८ उमेदवारी अर्ज वैध झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार मनोज देशमुख, देवळ्याच्या तहसीलदार सौ. शर्मिला भोसले यांनी दिली.
आता चांदवड मतदारसंघात सद्यस्थितीत १८ उमेदवार रिंगणात आहेत. बुधवारी (दि. १) आॅक्टोबर रोजी माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल.
निवडणुकीसाठी १९ उमेदवारांनी ३६ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात डॉ. आत्माराम कुंभार्डे, प्रवीण ठाकरे, भूषण कासलीवाल, गोविंद देवमन पगार, रमजान हावलभाई पठाण, उदयकुमार निंबाजी अहेर, बाळासाहेब मधुकर माळी यांचे सात अर्ज एबी फॉर्म नसल्याने अवैध झाले. सद्यस्थितीत भारतीय काँग्रेसचे शिरीषकुमार कोतवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमबाबा भालेराव, शिवसेनेचे नितीन रघुनाथ अहेर, भाजपाचे डॉ. राहुल दौलतराव अहेर, मनसेचे डॉ. नवलकिशोर शिंदे या प्रमुख पाच उमेदवारांसह सौ. अलका महेंद्र केदारे, अशोक भिवाजी हिरे, भीमराव निरभवणे, डॉ. आत्माराम पोपटराव कुंभार्डे, प्रवीण ठाकरे, दत्तू रामचंद्र गांगुर्डे, संतू उत्तम शिंदे, गोंविद देवमन पगार, उदयकुमार निंबाजी अहेर, आनंदा मनोहर बनकर, भूषण जयचंद कासलीवाल, सुधाकर पांडुरंग पवार, बाळासाहेब मधुकर माळी या अपक्ष उमेदवारांसह एकूण १८ अर्ज वैध ठरले.
कळवणला चार अर्ज अवैध
कळवण : कळवण - सुरगाणा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय पक्षाचे सहा तर अपक्ष दोन असे आठ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले, तर विविध कारणांनी चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.
सोमवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या कक्षात नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. छाननीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अर्जुन पवार, माकपचे जिवा गावित, भाजपाचे यशवंत लक्ष्मण गवळी, कॉँग्रेसचे धनराज गांगुर्डे, बसपाचे तुळशीराम खोटरे यांचे, तर अपक्ष निवृत्ती शिवाजी चौरे व वामनराव कडू बागुल यांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले. धर्मा भीमजी पवार यांनी पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्याने व अपक्ष फॉर्मवर १० ऐवजी आठ सुचकांची नावे व सह्या असल्याने अर्ज अवैध ठरविण्यात आला. भाजपाचे डमी उमेदवार समीर चव्हाण व माकपचे डमी उमेदवार हेमंत वाघेरे यांचे नामनिर्देशन पत्र छाननीदरम्यान रद्दबादल करण्यात आले. राष्ट्रवादीचे उमेदवार ए.टी. पवार व भाजपाचे यशवंत गवळी यांच्या नामनिर्देशन पत्रासमवेत दाखल केलेल्या शपथपत्राला यावेळी आव्हान देण्यात आले; मात्र निवडणूक निर्णय अधिकारी पाण्डेय यांनी सदर बाब न्यायालयीन असल्याचे सांगून अर्ज वैध ठरविला.
नांदगाव : येथे तीन अर्ज अवैध ठरविण्यात आले असून, छाननीनंतर २९ उमेदवार वैध ठरविण्यात आले. किरकोळ आक्षेप यावेळी घेण्यात आले; मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी शंकेचे निरसन करून निर्णयाप्रमाणे उर्वरित अर्ज वैध असल्याचे पटवून दिले. अवैध ठरलेल्या अर्जांमध्ये दिलीप नरवडे यांचे प्रतिज्ञापत्र वेळेत न आल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. चंद्रकांत उबाळे यांचे सूचक जास्त असल्यामुळे व प्रवीण दौलतराव पगारे यांचा एबी फॉर्म (बसपा) जोडला नाही म्हणून अर्ज अवैध ठरविण्यात आला. छाननीनंतर अनिल गंगाधर अहेर (काँग्रेस), पंकज छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस), जयंत शिवाजी सानप (मनसे), सूरज भीमराव गायकवाड (बसपा), सुहास द्वारकानाथ कांदे (शिवसेना), संजय बबनराव सानप (भाकपा), अद्वय प्रशांत हिरे पाटील (भाजपा), समाधान भगवान जगताप (बहुजन मुक्ती पार्टी) यांच्यासह २१ अपक्ष उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.