बळीराजा आर्थिक संकटात

By Admin | Updated: September 29, 2016 01:38 IST2016-09-29T01:37:37+5:302016-09-29T01:38:02+5:30

शेतकऱ्यांची फरपट : भाजीपाला जनावरांना चारण्याची वेळ

The victims of financial crisis | बळीराजा आर्थिक संकटात

बळीराजा आर्थिक संकटात

नायगाव : सध्या बाजारात सर्वच शेतमालाचे भाव गडगडल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.
गेल्या वर्षभरापासून कांद्याने शेतकऱ्यांचा चांगलाच वांदा केला आहे. दिवसागणीक कमी होत गेलेल्या बाजारभावाने शेतकऱ्यांना चांगलेच आर्थिक अडचणीत आणले, तर काही शेतकऱ्यांचा पिकवलेला कांदा चाळीत सडल्याने तो बाहेर काढण्यासही पैसे मोजावे लागण्याची नामुष्की यंदा शेतकऱ्यांवर ओढवली आहे. सध्या बाजारात येत असलेल्या सर्वच पालेभाज्या व इतर पिकांना कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. कोबी, फ्लॉवर, टमाटे आदि महागड्या पिकांना दीड ते दोन रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत आहे. या बाजारभावामध्ये उत्पादन खर्च तर दूरच, तो बाजारात आणण्यासाठी येणारा खर्चही हातात पडत नसल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.
मेथी, शेपू, कोथिंबीर, भेंडी, मिरची आदि पालेभाज्या बाजारात सध्या विक्रीअभावी जागेवरच सोडून जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी हा भाजीपाला शेतातच जनावरांना चारल्याचे, तर काही शेतकऱ्यांनी पिकांवर नांगर फिरवल्याचे चित्र नायगाव खोऱ्यात दिसत आहे.
कोबी, टमाटे, फ्लॉवर आदि पिकांसाठी महागडी औषधे, फवारणी, मजुरी, खते आदिंचा मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. मात्र, ही सर्व पिके सध्या व्यापारी मातीमोल भावात खरेदी करत आहे. नायगाव भागात कोबी व टमाटे या दोन्ही पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. यात कोबी एक ते दीड रुपया किलोने, तर विविध रोगांच्या तडाख्यात कसेबसे बचावलेले टमाट्याचे पीकही कवडीमोल भावाने विकावे लागत आहे. अशा या सर्वच पिकांचे भाव मातीमोल झाल्याने शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. महागड्या पिकांच्या लागवड खर्चाने शेतकरी आणखी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे.
संपूर्ण वर्षभर या ना त्या कारणांनी शेतकरी आर्थिक संकटात अडकत गेला आहे. कांद्यापाठोपाठ सर्वच पिकांना कवडीमोल भाव मिळत असताना शेतकऱ्यांची होणारी ही सध्याची परिस्थिती कोणत्याच प्रसारमाध्यमांना किंवा ग्राहकांना दिसत नाही का, असा संतप्त
सवाल विचारला जात आहे. उत्पादन खर्च फिटून चार पैसे बळीराजाच्या हातात पडायला लागले की मग मात्र सर्वच स्तरांतून शेतकरीविरोधी आवाज उठतो व सरकार बाजारभाव नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करते आणि ग्राहकांना न्याय देण्यासाठी बळीराजाला आर्थिक कोंडीत सापडवते. (वार्ताहर)
 

Web Title: The victims of financial crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.