ज्येष्ठ रंगकर्मी मुरलीधर खैरनार यांचे निधन
By Admin | Updated: December 6, 2015 23:55 IST2015-12-06T23:54:33+5:302015-12-06T23:55:28+5:30
सांस्कृतिक क्षेत्राला धक्का : अभ्यासू, बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले

ज्येष्ठ रंगकर्मी मुरलीधर खैरनार यांचे निधन
नाशिक : ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक, पत्रकार तथा नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘शोध’ या कादंबरीचे अभ्यासू लेखक मुरलीधर काळू खैरनार (५८) यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. अखेर रविवारी दुपारी १२.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी अॅड. मृणालिनी खैरनार, कन्या अॅड. रुक्मिणी खैरनार असा परिवार आहे. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर नाशिक अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
खैरनार यांच्यावर वीस दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजीवनगर परिसरातील त्यांच्या निवासस्थानी सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. उत्तम नाट्य दिग्दर्शक, अभिनेते, माहितीपट निर्माते, लेखक, कवी, व्याख्याते असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. २९ जुलै १९५७ रोजी जन्मलेल्या खैरनार यांनी तीस वर्षांहून अधिक काळ नाट्य दिग्दर्शन केले. आवर्त, बिरबलाची गोष्ट, आणखी एक नारायण निकम, आरोपी अनंत राघो बनाम, जास्वंदीचे ओले हात, अजब न्याय वर्तुळाचा, राजाची गोष्ट, घालीन लोटांगण, शुभमंगल, चूकभूल द्यावी घ्यावी आदि अनेक नाटकांच्या दिग्दर्शनासह त्यांनी अभिनयही केला. त्यांच्या ‘गाढवाचं लग्न’ या व्यावसायिक नाटकाचे आजवर तीनशेहून अधिक प्रयोग झाले. कुसुमाग्रजांच्या ‘वैष्णव’ या कादंबरीवर आधारित मालिकेचे दिग्दर्शन त्यांनी केले. काही काळ नाशिक व मुंबईत पत्रकारिता करणाऱ्या खैरनार यांनी शेतकरी संघटनेचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काही वर्षे काम पाहिले. ‘शोध’व्यतिरिक्त त्यांचे ‘मुळीच अवघड नाही’ हे स्मरणशक्ती विकासावरचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद, दीपक मंडळ, सावाना, कुसुमाग्रज प्रतिष्ठान अशा अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे ते माजी प्रमुख कार्यवाह होत.
दरम्यान, खैरनार यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बुधवारी (दि. ९) सायंकाळी ६.३० वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शोकसभा होणार आहे. (प्रतिनिधी)