पहिल्याच दिवशी सुमारे पाच हजार अर्ज
By Admin | Updated: June 27, 2014 00:12 IST2014-06-27T00:06:10+5:302014-06-27T00:12:25+5:30
पहिल्याच दिवशी सुमारे पाच हजार अर्ज

पहिल्याच दिवशी सुमारे पाच हजार अर्ज
नाशिक : दुपारी तीन वाजेनंतर शाळांमधून मूळ गुणपत्रक मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी लागलीच प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ केला
आहे. त्यानुसार शहरातील महाविद्यालयांमध्ये पहिल्याच दिवशी हजारो अर्ज दाखल झाले. केटीएचएम, एचपीटी, आरवायके आणि बीवायके या महाविद्यालयांत आॅनलाइन आणि आॅफलाइन अशा दोन्ही पद्धतीने सुमारे पाच हजार अर्ज दाखल झाले आहेत. केटीएचएम महाविद्यालयाने यंदा प्रथमच संपूर्ण प्रवेशप्रक्रिया आॅनलाइन केल्याने पहिल्याच दिवशी तब्बल दीड हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले.
शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या निर्देशानुसार आजची अकरावी प्रवेशप्रक्रिया दुपारी तीन वाजेनंतर सुरू करण्यात आली. उद्यापासून मात्र सर्वत्र सकाळी ११ वाजेपासूनच अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरू होणार आहे. दुपारी अर्ज विक्रीस प्रारंभ झाला असला, तरी महाविद्यालयांच्या मेरिट अर्जांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. एचपीटी, बीवायके आणि आरवायके या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. यंदा केटीएचएमने आॅनलाइन प्रक्रिया राबविल्याने नेहमी दिसणारी विद्यार्थ्यांची रांग या ठिकाणी दिसून आली नाही. विद्यार्थ्यांना सर्व माहिती आणि पासवर्ड हे आॅनलाइनच उपलब्ध होणार आहेत. मविप्र संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयासाठी आॅनलाइन पद्धतीने सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल ३१०० अर्ज दाखल झाले. त्यामध्ये केटीएचएमसाठी तब्बल २१०० अर्जांची नोंद झाली आहे. एचपीटी, आरवायके महाविद्यालयांतही सुमारे २८०० मेरिट अर्जांची विक्री झाली, तर सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले. इतर महाविद्यालयांतही काही प्रमाणात मेरिट अर्जांची विक्री झाली; मात्र प्रतिसाद अत्यल्प दिसून आला. उद्या मात्र सर्वत्र गर्दी होण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या १७ रोजी इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आज आपापल्या शाळांमधून मूळ गुणपत्रकांचे वाटप करण्यात आले. मूळ गुणपत्रक मिळणार असल्याने विद्यार्थ्यांनी दुपारी शाळांमध्ये गर्दी केली होती. विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रक मिळाल्यानंतरच अकरावीची प्रवेशप्र्िरकया राबविण्याचे आदेश असल्याने आज शहरातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची सज्जता करण्यात आली होती. आज अपेक्षेप्रमाणे विद्यार्थी महाविद्यालयाकडे फिरकले नाहीत; मात्र उद्या ११ वाजताच प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांची तोबा गर्दी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)