वैशाली झनकर पळाल्या की पळविल्या गेल्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:19 IST2021-08-13T04:19:06+5:302021-08-13T04:19:06+5:30
सोमवारी लाचेचा सापळा यशस्वी रात्र झाल्यामुळे वैशाली झनकर यांची चाैकशी करून त्यांना घरी सोडण्यात आले व दुसऱ्या दिवशी पोलीस ...

वैशाली झनकर पळाल्या की पळविल्या गेल्या?
सोमवारी लाचेचा सापळा यशस्वी
रात्र झाल्यामुळे वैशाली झनकर यांची चाैकशी करून त्यांना घरी सोडण्यात आले व दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समजपत्र लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने दिले होते. प्रत्यक्षात त्या पोलीस ठाण्यात व न्यायालयातही हजर राहिल्या नसल्याचे उघड झाले आहे. रात्र असल्यामुळे महिला अधिकाऱ्याला अटक करता येत नाही असे स्पष्टीकरण ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सांगितले असले तरी, आठ महिन्यांपूर्वी जळगावच्याच एका प्रांत असलेल्या महिला अधिकाऱ्याला लाचप्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर सदर महिला अधिकाऱ्याला रात्रभर नजीकच्या पोलीस ठाण्यात बसवून ठेवत दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण्यात आले होते. तर पिंपळगाव बसवंत येथे महिला तलाठ्याला ताब्यात घेतल्यानंतर रात्रभर सदर तलाठ्याला तिच्याच घरात नजरबंद करून ठेवण्याची कार्यवाही करून सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. विशेष म्हणजे ज्यांनी झनकर यांच्यावर सापळा लावला त्याच ठाण्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख पंजाबराव उगले नाशिकला एसीबीत असताना नांदगाव जमीन घोटाळ्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात संशयित महिला अधिकाऱ्यांच्या घराबाहेर पोलीस जाप्ता लावून नजर ठेवण्यात आली होती. त्याच उगले यांनी झनकर यांच्यावर कारवाई करताना त्यांना समजपत्र देऊन सोडून देण्याची केलेली कारवाई पाहता, यात एसीबीचा पक्षपातीपणाच उघड झाला आहे.
मुळात एसीबीची कारवाई ही नियोजनबद्ध पद्धतीने तसेच पुढील शक्य-अशक्यता लक्षात घेऊनच केली जाते. झनकर ह्या तक्रारदाराकडून पैसे घेणार हे निश्चित झाले होते. कधी घेणार याविषयीही आगावू जाणीव होती. त्यामुळे सापळा यशस्वी झाल्यानंतर सहा ते सात तास चौकशीचे, पंचनाम्याचे सोपस्कार चालतील याविषयी एसीबीचे अधिकारी जाणून होते. असे असताना झनकर प्रकरणात एसीबीच्या अधिकाऱ्यांनी हात अखडता घेण्यामागचे कारण काय? विशेेष म्हणजे सापळा यशस्वी झाल्यानंतर स्थानिक एसीबीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन ठाण्याच्या पथकाला मदतीची तयारीही दर्शविली होती. असे असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यामागे कारणदेखील गुलदस्त्यात राहिले आहे.