आरोग्य विद्यापीठाचे पुन्हा घूमजाव
By Admin | Updated: May 21, 2014 23:57 IST2014-05-21T23:55:10+5:302014-05-21T23:57:50+5:30
फंडातील कर्मचार्यांच्या नोकरीचा प्रश्न : कुलसचिवांचा बदलला सूर

आरोग्य विद्यापीठाचे पुन्हा घूमजाव
फंडातील कर्मचार्यांच्या नोकरीचा प्रश्न : कुलसचिवांचा बदलला सूर
नाशिक : आपण कर्मचार्यांच्याच बाजूने आहोत, असे विधान कर्मचार्यांसमोर करणार्या कुलसचिवांनी मात्र कुलगुरूंसमोर आपले पूर्वीचे रूप दाखवून दिले. फंडातील कर्मचार्यांना कोणत्याही परिस्थितीत शपथपत्र द्यावेच लागेल, त्यांच्याबाबत लवचिक भूमिका घेता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. ज्यांनी शपथपत्र भरून दिले नाही त्यांच्या इन्क्रिमेन्ट आणि मुदतवाढीबाबत विचार करता येणार नाही, असा थयथयाटही त्यांनी केला. अखेर कुलगुरूंनी चर्चेदरम्यान फंडातील कर्मचार्यांवर टाच येणार नाही याबाबत सूतोवाच केले.
आरोग्य विद्यापीठातील फंडातील कर्मचार्यांची मुदत २०१७ मध्ये संपणार असल्याने त्यांना यापुढे मुदतवाढ न देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर फंडातील कर्मचार्यांना नोकरीवर दावा करता येणार नाही, असे शपथपत्रच भरून मागितले आहे. तथापि, असे एकही पत्र फंडातील कर्मचार्यांनी भरून दिलेले नाही. या प्रकरणी काही कर्मचार्यांनी कुलसचिव गरकळ यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आपण कर्मचार्यांच्याच बाजूने असल्याचे सांगत मवाळ भूमिका घेतली होती; मात्र कुलगुरूंच्या दालनात एका चर्चेत त्यांनी फंडातील कर्मचार्यांच्या विरोधात विधान केले आहे. कोणत्याही कर्मचार्याला शपथपत्र भरून द्यावेच लागते. शासकीय नोकरीतील अधिकारीही शपथपत्र देतात, मग फंडातील कर्मचार्यांनीही ते दिलेच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली. यावेळी त्यांनी फंडातील कर्मचारी चुकीची माहिती माध्यमांना देत असल्याचेही म्हटले.
खरे तर फंडातील एकाही कर्मचार्याने शपथपत्र भरून दिलेले नसतानाही कुलसचिवांनी अनेकांनी शपथपत्रे भरून दिल्याची माहिती कुलगुरूंना दिली. यावेळी त्यांनी एमडी, एमएस विद्यार्थ्यांच्याही बाबतीत अशीच भूमिका घेतली. हे विद्यार्थी चुकीची माहिती पसरवित असून, विद्यापीठाने कोणताही नवीन नियम केेलेला नाही. प्रत्येक विषयात ५० टक्के गुण हा यापूर्वीचा निर्णय आहे. त्यावेळी कुणी आवाज उठविला नाही; आत्ताच का विद्यार्थर्ी जागे झाले, अशी भूमिका त्यांनी कुलगुरूंसमोर घेतली. तत्पूर्वी त्यांनी याच विद्यार्थ्यांसमोर मवाळ भूमिका घेतली होती. कुलगुरूंच्या दालनात कुलसचिवांमध्ये नेमका कोणता संचार होतो आणि ते कर्मचारी, विद्यार्थ्यांना चुकीची माहिती असल्याचा कांगावा करून का नेहमीच थयथयाट करतात हाच खरा संशोधनाचा विषय ठरला आहे. (प्रतिनिधी)
कुलसचिवांकडून लंगडा बचाव
कुलगुरूंचा वरदहस्त लाभल्याने कुलगुरूंचे दालन जणू आपलेच दालन असल्याच्या आविर्भावात कुलसचिव वादग्रस्त विधाने करीत असल्याच्या आरोपाला पुन्हा एकदा बळकटी मिळाली आहे. फंडातील कर्मचारी आणि एमडी, एमएस विद्यार्थ्यांवर कुलगुरूंपेक्षा कुलसचिवांनीच अधिक खापर फोडले. कर्मचारी आणि सदर विद्यार्थी ही चुकीची माहिती पसरवित असल्याचा कांगावा करीत त्यांनी विद्यापीठाची भूमिकाच कशी बरोबर आहे याचे तुणतुणे वाजविले. अशाच प्रकारचा प्रयत्न त्यांनी गेल्या १५ रोजी मुंबईत वैद्यकीय शिक्षण सचिवांसमोर केला असता सचिवांनी त्यांना समज दिली होती असे खात्रीशीर समजते; मात्र येथे कुलगुरू त्यांना अडविणे शक्य नाही म्हटल्यावर गरकळ यांनी एमडी, एमएस प्रकरणाचे खापर विद्यार्थ्यांवर, तर शपथपत्राच्या सक्तीविषयी कर्मचार्यांवरच तोंडसुख घेतले.