विश्वबंधुत्व ही भारतीय संस्कृती
By Admin | Updated: September 26, 2016 01:38 IST2016-09-26T01:37:53+5:302016-09-26T01:38:20+5:30
कृष्णमूर्ती : विवेकानंद केंद्र येथे आयोजित व्याख्यानात प्रतिपादन

विश्वबंधुत्व ही भारतीय संस्कृती
नाशिक : विश्वबंधुत्वाची संकल्पना संत ज्ञानेश्वरांपासून ते विवेकानंदांपर्यंत अनेक संतांनी मांडली. या विश्वातील केवळ मानवच नाही, तर चराचरे माझे सोबती आहेत, हा भारतीय संस्कृतीचा विचार आहे; त्यावर आता पाश्चात्त्य संस्कृतीचे अतिक्रमण झाल्याने आज विवेकानंदांची शिकवण नव्याने देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत एन. कृष्णमूर्ती यांनी केले.
विवेकानंद केंद्राच्या विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्ताने कन्याकुमारी येथील सेवाव्रती एन. कृष्णमूर्ती यांचे व्याख्यान झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक देवेंद्र बापट, तर व्यासपीठावर विवेकानंद केंद्राचे प्रदेशाध्यक्ष अभय बापट अध्यक्षस्थानी होते. कृष्णमूर्ती पुढे म्हणाले की, जगाची निर्मिती झाल्यानंतर पारिवारिक गोष्टीच दिसून आल्या. माणसाला जग हे आपले बंधू असल्यासारखे वाटावे, ही अपेक्षा व्यक्त केली गेली. शिकागोमध्ये स्वामी विवेकानंदांचे विचार ऐकल्यानंतर त्यांचे कौतुक केले गेले. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही.
कार्यक्रमाचे अध्यक्ष देवेंद्र बापट यांनी मनोगत व्यक्त केले. अभय बापट यांनी विवेकानंद केंद्राचे कार्य केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती देतानाच केंद्राच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. चित्रा देशपांडे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन व आभार विनायक सोलापुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उरी येथे लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (प्रतिनिधी)