अंतर्गत कलह राष्ट्रवादीला भोवणार
By Admin | Updated: January 15, 2017 00:38 IST2017-01-15T00:38:37+5:302017-01-15T00:38:53+5:30
जायखेडा गट : उमेदवारांच्या शोधासाठी भाजपाची धावाधाव

अंतर्गत कलह राष्ट्रवादीला भोवणार
नितीन बोरसे सटाणा
बागलाण तालुक्यातील जायखेडा गट म्हणजे तालुक्याचे राजकीय केंद्रबिंदू म्हणून मानला जात आहे. माजी आमदार दिलीप व उमाजी या बोरसे बंधूंचा या गटावर चांगलाच प्रभाव आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांचेदेखील होमग्राउंड आहे. गेल्या दशकापासून या गटावर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र राष्ट्रवादीकडे विद्यमान सदस्य यतीन पगार यांच्या रूपाने तगडा उमेदवार असताना पक्षांतर्गत सुरू असलेल्या शह-काटशहच्या राजकारणामुळे पक्षाला गड शाबूत ठेवणे अवघड आहे. भाजपाला गेल्या निवडणुकीतील दारुण पराभवाचे उट्टे काढायची असेल तर पक्षनिष्ठेचा डांगोरा पिटण्यापेक्षा इलेक्टिव्ह मेरीटचा उमेदवार शोधला तरच सत्ता मिळेल, असे चित्र आहे. एकंदरीत बोरसे बंधू व राष्ट्रवादीच्या पगार, भामरे यांच्या वर्चस्वाच्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
जायखेडा गटाची निर्मिती गेल्या दहा वर्षांपूर्वी झालेल्या गट पुनर्रचनेत करण्यात आली आहे. या गटावर माजी मंत्री कै. डॉ. दौलतराव अहेर, शिखर बँकेचे माजी अध्यक्ष कै. जयवंतराव सावंत, माजी आमदार दिलीप बोरसे, माजी सभापती सोमनाथ ब्राह्मणकर यांचा प्रभाव राहिला आहे. माजी आमदार उमाजी बोरसे यांच्या रूपाने भाजपाला एकदा या परिसराचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. बोरसे यांनी मिनी मंत्रालय गाठल्यानंतर थेट विधानसभा गाठली होती. हा गट तसा कॉँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया व एस. टी. बसचालक अभिमन फुला सोनवणे यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. कालांतराने कॉँग्रेसला गटबाजीची लागण झाल्याने बालेकिल्ल्याची पडझड झाली. दरम्यानच्या काळात माजी मंत्री डॉ. अहेर यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या भागात राष्ट्रवादीची चलती झाली. गेल्या दहा वर्षांपूर्वी डॉ. अहेर यांचे निकटवर्तीय म्हणून मानले जाणारे विजय भटू सावळा हे पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांनी कॉँग्रेसचे आत्माराम भामरे, भाजपाचे भाऊसाहेब चव्हाण यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसने उत्राणे येथील माजी सरपंच यतीन पगार यांना उमेदवारी बहाल केली होती. दांडगा जनसंपर्क, नातेगोते यांच्या जोरावर चांगल्या मताधिक्याने पगार यांनी मिनी मंत्रालय गाठले. त्यांनी भाजपाचे सदाशिव कापडणीस, कॉँग्रेसचे पंडितराव अंबर मोरे, चंद्रसिंग सूर्यवंशी यांचा पराभव केला, तर जायखेडा व आसखेडा गणात मात्र भाजपाने सत्ता काबीज केली. जायखेडामधून लक्ष्मण सोनवणे, तर आसखेडा गणात गीता सोनवणे विजयी झाल्या होत्या. करंजाडी नदीवर केलेली सीमेंट प्लग बंधारे, मोसम नदीवर बांधलेली भूमिगत बंधारे, बिजोटे व श्रीपूरवडे, उत्राणे येथे करण्यात आलेले नालाजोड प्रकल्प यामुळे हा गट टॅँकरमुक्त करण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. गावागावांत सीमेंटचे रस्ते, भीमाशंकर मंदिर परिसराचे सुशोभीकरण, भाविकांसाठी सर्व सोयीसुविधा आदिंसह मंगल कार्यालय उभारण्यात आले आहे. जायखेडा, करंजाड, बिजोटे, उत्राणे येथे बहुद्देशीय केंद्र, ग्राम सचिवालय व विश्रामगृह उभारून एक मॉडेल गट म्हणून उदयास येत आहे. त्या जोरावर त्यांनी आता पुन्हा या परिसराचा कायापालट करण्यासाठी दंड थोपटले आहेत. आजच्या घडीला तरी विद्यमान सदस्य यतीन पगार यांना टक्कर देऊ शकणारा तगडा उमेदवार कोणत्याही पक्षाकडे दिसून येत नाही.