मुक्त’च्या पीएच.डी.ला यूजीसीचा ब्रेक
By Admin | Updated: November 19, 2015 00:17 IST2015-11-19T00:15:47+5:302015-11-19T00:17:15+5:30
प्रवेश बंद : सैरभैर कारभारामुळेच लावला लगाम

मुक्त’च्या पीएच.डी.ला यूजीसीचा ब्रेक
सतीश डोंगरे नाशिक
तीनच महिन्यांपूर्वी मुक्त विद्यापीठाने गाजावाजा करीत पूर्णवेळ पीएच.डी. सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यूजीसीने या निर्णयाला ब्रेक लावत पीएच.डी. पूर्णत: बंद करावी अशा शब्दात मुक्त विद्यापीठाला ठणकावले. विद्यापीठाने यापूर्वी पीएच.डी. पदव्या खैरातीप्रमाणे वाटल्याच्या प्रकरणामुळेच यूजीसीने हा निर्णय घेतला असून, त्याबाबत विद्यापीठाकडून लेखी हमीही घेण्यात आली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात २००९ मध्ये खैरातीप्रमाणे पीएच.डी. पदवी वाटल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर विद्यापीठाने तांत्रिक अडचणींचे कारण देऊन पीएच.डी. बंद केल्याचे जाहीर केले होते. मात्र कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी पदभार घेताच आपल्या अजेंड्यावर पीएच.डी.चा मुद्दा अग्रस्थानी असल्याचे जाहिर करीत लागलीच पुर्णवेळ पीएच.डी. अभ्यासक्रम पुन्हा सुरूही करीत त्यानुसार प्रवेशप्रक्रियाही राबविण्यात आली. मात्र विद्यापीठाच्या मनसुब्यावर तीनच महिन्यांत यूजीसीने पाणी फेरले. दिल्ली येथे झालेल्या देशातील मुक्त विद्यापीठांच्या बैठकीत स्पष्ट शब्दात पीएच.डी. बंद करण्याचे यूजीसीने निर्देश दिले. तसेच येत्या शैक्षणिक वर्षापासून पीएच.डी.चे प्रवेश
घेतले जाणार नाहीत, अशी लेखी
हमी देखील घेतली आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे पीएच.डी. प्रवेश निश्चित झाले आहेत, त्यांचे प्रवेश रद्द केले जाऊ नये, असेही यूजीसीने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मुक्त विद्यापीठाची दूरशिक्षण परिषद (डिस्टन्स एज्युकेशन कौन्सिल) बरखास्त करून यूजीसीच्या कार्यपद्धतीची अंमलबजावणी केली जात असल्याने विद्यापीठाच्या कार्यपद्धतीत अनेक बदल केले जात आहेत. त्याची अंमलबजावणी करताना विद्यापीठाची चांगलीच दमछाक होत आहे.