संरक्षक भिंतीसाठी दोन-दोन प्रस्ताव
By Admin | Updated: August 5, 2014 01:55 IST2014-08-05T01:24:33+5:302014-08-05T01:55:26+5:30
संरक्षक भिंतीसाठी दोन-दोन प्रस्ताव

संरक्षक भिंतीसाठी दोन-दोन प्रस्ताव
नाशिक : जुन्या नाशकातील काझीच्या गढीवरून राजकारण रंगले असले, तरी आपण राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवकांना बोलावून सर्वसमावेशक निर्णय घेतला. त्यानंतर रविवारी गढीवर जाऊन एका आमदाराने राजकारण सुरू केले, असा दावा महापौर अॅड. यतिन वाघ यांनी केला. इतकेच नव्हे, तर गढीला संरक्षक भिंत बांधण्यासाठी महापालिका तयार असून, त्यानुसार माती परीक्षणाच्या निविदा मागविल्या आहेत, असे स्पष्टीकरण दिले. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे आमदार आणि नगरसेवकांनी पाटबंधारे विभागामार्फत संरक्षक भिंत बांधण्याची यापूर्वीच माहिती दिल्याने भिंत नक्की कोण बांधणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काझीची गढी येथे संरक्षक भिंत बांधण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी हट्ट धरला असून, स्थलांतरास नकार दिला आहे. त्यानंतर रविवारी नागरिकांनी गढीवरच ठिय्या आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव आणि नगरसेवक विनायक खैरे व रंजना पवार यांनी महापौरांवर राजकारण केल्याचा आरोप केला होता. तथापि, महापौरांनी आरोप फेटाळला. शनिवारी राष्ट्रवादीचे दोन्ही नगरसेवक आणि गाडगे महाराज धर्मशाळेचे विश्वस्त, पालिकेचे अधिकारी अशी संयुक्त बैठक आपण घेतली. त्यावेळी रविवारपासून नागरिकांना अन्यत्र स्थलांतरित करण्याचे ठरले होते; परंतु रविवारी गढीवर एक आमदार आले आणि राजकारण सुरू झाले. आपल्या वतीने कोणतेही राजकारण केले गेले नाही, असे सांगून महापौर अॅड. वाघ यांनी सांगितले की, गेल्या नोव्हेंबर महिन्यात गढी ढासळल्यानंतरच महापालिकेने गढीला संरक्षक भिंत बांधण्याची तयारी केली होती. परंतु नंतर शासन ही भिंत बांधणार असल्याचे सांगण्यात आले. तरीही महापालिकेने माती परीक्षणासाठी निविदा मागविल्या; परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आता पुन्हा निविदा मागविल्या आहेत. महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत गढीच्या परिसरातील नगरसेवकांनी संरक्षक भिंत बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारे निधीची मागणी केली नाही तरीही अंंदाजपत्रकात स्वत:हून पाच कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगितले. त्यामुळे महापालिकेचीदेखील भिंत बांधण्याची तयारी सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले. (प्रतिनिधी)