परंपरा ‘नवा चेहरा’ देण्याची..
By Admin | Updated: June 13, 2014 00:20 IST2014-06-12T22:30:52+5:302014-06-13T00:20:46+5:30
परंपरा ‘नवा चेहरा’ देण्याची..

परंपरा ‘नवा चेहरा’ देण्याची..
करी फिरवली नाही तर ती करपते(च) अशा मानसिकतेचा मतदार हे इगतपुरी मतदारसंघाचे स्वभाव वैशिष्ट्य! .आजवर या तालुक्याने एकदाही कोणाच्या गळ्यात सलग विजयाची माळ टाकलेली नाही. त्यामुळेच नव्या नेतृत्वाचा उदय ही या मतदारसंघाची आणखी एक विशेष बाब! या मतदारसंघात पुनर्रचनेनंतर बरीच उलथापालथ झाली असली तरी हिंदू महादेव कोळी आणि ठाकूर समाजाची निर्णायकी भूमिका कायम राहिली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे पुन्हा बदलली असून, यावेळी पक्षीय राजकारणापेक्षा मैत्रीचे संबंधच जास्त ठळकपणे दिसून येणार आहेत...
इगतपुरी हा अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित असलेला विधानसभेचा मतदारसंघ. गतवेळी या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर तालुक्याचा महत्त्वाचा ठरणारा भाग सिन्नर मतदारसंघाला जोडण्यात आला तर इगतपुरी मतदारसंघात त्र्यंबकेश्वर आणि हरसूलचा भाग समाविष्ट करण्यात आला. यामुळे या मतदारसंघाची समीकरणे बदलून गेली आहेत. तीन भागांचा जरी हा मतदारसंघ असला तरी राजकारणाचा एकूणच केंद्रबिंदू इगतपुरी तालुकाच ठरला आहे.
बदललेली राजकीय समीकरणे
शरद पवार यांचे समर्थक माजी आमदार शिवराम झोले यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेतृत्व नवख्याच्या हाती आले आहे. राष्ट्रवादीचा सहकारी पक्ष असलेल्या कॉँग्रेस पक्षांतर्गत दोन गट आहेत.
इगतपुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व कॉँग्रेसकडे असले तरी मध्यंतरीच्या काळात तालुक्याच्या राजकारणात अनेक फेरबदल घडले आहेत. गत विधानसभा निवडणुकीच्या वेळी स्व.गोपाळराव गुळवे यांनी शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ कॉँग्रेसकडे खेचून आणला. तेव्हा निर्मला गावित यांच्या रूपाने राजकारणात नवा चेहरा उदयास आला. गुळवे यांच्या पश्चात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांचे सुपुत्र संदीप गुळवे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाचे दावेदार असतानाही सौ. गावित यांनी त्यांना डावलून त्र्यंबकेश्वर तालुक्याला संधी दिल्याच्या कारणावरून कॉँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली. या दुहीचा फटका त्यानंतर झालेल्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये कॉँग्रेसला बसला. इगतपुरी पालिकेच्या निवडणुकीत कॉँग्रेसला साफ अपयश आले. घोटी बाजार समितीत संदीप गुळवे यांच्या गटाने बाजी मारली. राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही सारे काही आलबेल नाही. या पक्षातही दोन गटांची धुसफूस आहेच. गोरख बोडके आणि उदय जाधव यांच्यातून विस्तवही जात नाही.
अगदी याउलट स्थिती शिवसेना-भाजपा आणि मित्रपक्षाची आहे. कॉँग्रेसच्या गटबाजीचा फायदा घेत युतीने तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. शिवराम झोले शिवसेनेत दाखल झाल्यामुळे येथील राजकीय समीकरणे पुन्हा बदलली आहेत.
इगतपुरीच्या मतदारांनी आतापर्यंत नवख्याच उमेदवाराला संधी दिल्याचा इतिहास आहे. शिवराम झोले, काशीनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड आणि निर्मला गावित अशा तत्कालीन नवख्या चेहऱ्यांना संधी देणाऱ्या या मतदारसंघाने भाकरी फिरविण्याची परंपरा कायम राखली आहे.
मतांचे विभाजन निर्णायक
इगतपुरी मतदारसंघात सर्वाधिक मतदार हे आदिवासी ठाकूर समाजाचे असून त्याखालोखाल हिंदू महादेव कोळी समाजाचे मतदान आहे. या मतदारसंघाला पूर्वी तालुक्याचा पूर्व भाग असताना या भागात असलेली हिंदू महादेव कोळी समाजाचे मते निर्णायक ठरत होती. मात्र, मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर ठाकूर समाजाच्या मतदानात निर्णायक झाले आहे. अर्थात ठाकूर समाज व हिंदू महादेव कोळी समाज विविध राजकीय पक्षाच्या गटातटात विभागला गेला असल्याने तसेच या समाजाचे अनेक इच्छुक एकमेकांविरोधात उभे राहत असल्याने या मताचे विभाजन होते, असा आजवरचा अनुभव आहे.
गत विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दुसऱ्या क्रमाकांची मते मिळाली होती, अर्थात त्यात पक्षापेक्षा तत्कालीन ्र्र्रआमदार काशीनाथ मेंगाळ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून मनसेकडून अजमाविलेले नशीब कारणीभूत ठरले. आघाडीच्या गणितात येथील जागा कॉँग्रेसच्या वाट्याला असल्यामुळे शिवराम झोले यांनी दोनवेळा बंडखोरी केली अर्थात त्यात त्यांना अपयशच आले. गतवेळी झोले यांच्या अपक्ष उमेदवारीचा फटका मनसेचे काशीनाथ मेंगाळ यांना बसला. गतवेळी तब्बल १९ उमेदवारांनी नशीब अजमाविले होते. त्यात हिंदू महादेव कोळी आणि ठाकूर समाजाचे अधिक उमेदवार असल्याने या मतांच्या विभाजनाचा फायदा कॉँग्रेसच्या निर्मला गावित यांना झाला.
अशी झाली लोकसभा...
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत इगतपुरी मतदारसंघाने राष्ट्रवादी कॉँग्रसचे उमेदवार छगन भुजबळ यांना मताधिक्य दिले असले तरी इगतपुरी तालुक्याने मात्र शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना आघाडी दिल्याचे दिसून येते. जिल्ह्यात इतरत्र पीछेहाट झालेली असताना केवळ इगतपुरी मतदारसंघानेच छगन भुजबळ यांना शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्यापेक्षा किंचतशी आघाडी दिल्याचे दिसते. हा मतदारसंघ आपली चांगल्या प्रमाणात पाठराखण करील, अशा कल्पनेत गाफील राहिलेले छगन भुजबळ आणि मोठ्या विकासकामांच्या तुलनेत मतदारसंघातील जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे समीर भुजबळ यांनी केलेले दुर्लक्ष यामुळे या मतदारसंघाने भुजबळ यांना केवळ १७४३ मतांची आघाडी दिल्याचे दिसते.
समस्या कायमच
धरणांचा तालुका अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात नवनवीन धरणे प्रस्तावित आहेत. त्यातील वाकी खापरी या धरणाचे काम पूर्ण झाले असून, भाम धरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. धरणाचे काम पूर्ण होत आले तरी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मात्र ‘जैसे थे’च आहे. या प्रश्नाकडे तालुक्यातील एकाही लोकप्रतिनिधीने लक्ष घातलेले नाही, अशी मतदारांची भावना आहे. पुनर्वसनाबरोबर स्थानिक प्रकल्पग्रस्तांसाठी रोजगाराच्या संधी नाहीत. सिंचन तसेच पिण्यासाठी अपुरे पाणी, रस्त्यांची बिकट स्थिती यांसह आरोग्य शिक्षण आदि मूलभूत समस्या कायम असल्याचे चित्र आहे. घोटी शहराजवळील शेणवड व जुन्हवणे आणि चिंचले खैरे या गावाला अद्याप रस्ताच नाही. जामुंडे आणि गव्हांडे या भागात अद्याप वीज पोहचली नाही. या प्रातिनिधिक बाबींवरून इगतपुरी मतदारसंघाची एकूण स्थिती स्पष्ट होते.