भाकरी फिरविण्याची परंपरा
By Admin | Updated: June 11, 2014 00:21 IST2014-06-10T23:15:55+5:302014-06-11T00:21:30+5:30
लोकसभेच्या निवडणुकीकडेही होऊ घातलेल्या विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच पाहिले गेले; परंतु गेल्या निवडणुकीत आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघाने समीकरणे बदलून टाकली आहेत.

भाकरी फिरविण्याची परंपरा
दलित-मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान, तर दुसरीकडे उमेदवार व त्याचा राजकीय पक्ष पाहून मतदान करणारे मतदार असा काहीसा विचित्र परंतु भाकरी करपू नये म्हणून नेहमी ती फिरवत ठेवणारा मतदारसंघ म्हणून नाशिक मध्य मतदारसंघाची ओळख असली, तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने मतदारांचे सामाजिक धु्रवीकरण झाले, ते पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत यापेक्षा काही वेगळी भूमिका हा मतदारसंघ घेईल असे वाटत नाही.
पाच वर्षांपूर्वीच्या लोकसभा व त्यापाठोपाठच्या विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहता, आत्ता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीकडेही होऊ घातलेल्या विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच पाहिले गेले; परंतु गेल्या निवडणुकीत आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघाने सामाजिक व राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. तसे पाहिले, तर एकीकडे मराठा व दुसरीकडे मराठेतरांची संख्या, कॉलनी, उंच इमारतींचे एकीकडे जाळे, तर दुसरीकडे विस्तीर्ण झोपडपट्टी अशी भौगोलिक व सामाजिक परिस्थिती असलेल्या या मतदारसंघाने मात्र कधीच कोणा एकाच्या दावणीला बांधून घेतले नाही, की कोणामागे फरफटतही गेला नाही. कारण आजवरच्या झालेल्या प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांना येथील मतदारांनी भाकरी फिरवून त्याची प्रचिती आणून दिली आहे. अगदी मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळी म्हणजेच सन २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचा अभ्यास केल्यास, जशी राजकीय परिस्थिती बदलली तशीच सामाजिक परिस्थितीही या मतदारसंघाने बदलली आहे. त्यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. कोणताही एक उमेदवार व त्याच्या पक्षाला या मतदारसंघाने कधीच साथ दिली नाही. त्यामुळे गेल्या लोकसभा व त्यापाठोपाठच्या विधानसभा व नुकत्याच झालेल्या लोकसभा अशा तीनही निवडणुकीत एकच साम्य होते, ते म्हणजे एक माळी विरुद्ध दोन मराठे. त्यामुळे राजकीय पातळीवर जशी या मतदारसंघाची चर्चा होते, तशीच ती आता सामाजिक व थोडक्यात जाती-पातीवरही होऊ लागली आहे. याला कारणही तसेच आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मराठेतर उमेदवार म्हणून समीर भुजबळ हे मैदानात उतरले व एकदा का मतदारसंघ समीरच्या व पर्यायाने छगन भुजबळ यांच्या ताब्यात गेला तर आपले राजकीय अस्तित्वच संपुष्टात येईल या भीतीने त्यांच्या उमेदवारीला सामाजिक कारणातून विरोध झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही झाली. फरक इतकाच होता, समीरला खुला विरोध झाला, तर छगन भुजबळ यांच्या बाबतीत तो सुप्त पण उद्रेकाच्या स्वरूपाचा होता. त्यामुळे या मतदारसंघातील लोकसभेच्या लढतीत एकीकडे एक विशिष्ट समाजघटक भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध करीत असताना, दुसरीकडे तितकाच इतरेतर समाज एकवटून त्यांच्या समर्थनार्थ उभा राहिला; परंतु त्याचा आवाज फारच क्षीण होता.
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे नाशिक लोकसभा असो वा विधानसभा, ज्यांनी-ज्यांनी यापूर्वी प्रतिनिधित्व केले, त्यातील माजी खासदार राजाभाऊ गोडसे वगळता सारेच उमेदवार याच विधानसभा मतदारसंघात वास्तव्यास आहेत. त्यामुळे नाही म्हटले तरी त्यांचे नातेगोते, हितचिंतक, मित्रपरिवार यांचाही नेहमीच प्रत्येक निवडणुकीत प्रभाव राहिला आहे. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत व नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही चित्र वेगळे होते. मध्य विधानसभा मतदारसंघाबाहेरीलच तिघे उमेदवार लोकसभेच्या रिंगणात होते. त्यातही ज्यांना या निवडणुकीआड विधानसभेची तयारी करायची होती, त्यांनी गेल्या लोकसभेला व आत्ताच्याही लोकसभेआड ती करून घेतली. फरक इतकाच, की गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला दुसऱ्या क्रमांकाची मते देणाऱ्या या मतदारसंघाने समीर भुजबळ यांना मोठी आघाडी दिली किंबहुना त्यांच्या विजयात याच मतदारसंघाचा हातभार लागला होता. त्यामुळे नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही राष्ट्रवादीला याच मतदारसंघातून फार मोठ्या अपेक्षा होत्या. विशेष म्हणजे, मतदानाच्या दिवशी दुपारनंतर मतदान केंद्रावर लोटलेली गर्दी पाहून तसे वातावरण निर्मितीही करण्यात आली होती. प्रत्यक्षात या गर्दीचाही उपयोग राष्ट्रवादीला होऊ शकला नाही. उलट राष्ट्रवादीला दुसऱ्या व मनसेला तिसऱ्या क्रमांकावर लोटून या मतदारसंघाने सेनेच्या पदरात भरभरून दान टाकून एक क्रमांकावर नेऊन ठेवले.
आजवरच्या निवडणुकीत कॉँग्रेस आघाडीची या मतदारसंघातील दीड लाखाच्या आसपास एकगठ्ठा असलेल्या दलित-मुस्लीम मतदारांवर भिस्त राहिली व काही काळ ती रास्तही होती, तर विरोधकांच्या दृष्टीने मध्यमवर्गीय परंतु मतदानाबाबत नेहमीच नकारात्मक असलेल्या मतदारांचा निरुत्साह ही डोकेदुखी होती.
या दोन्ही गोष्टी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोडीत निघाल्या. सत्ताधाऱ्यांविरुद्धचा रोष जसा एकगठ्ठा मतदारांनी काढला, तसाच तो दरवेळी निरुत्साह दाखविणाऱ्या मतदारांनीही घराबाहेर पडून दाखविला. त्यातून एक गोष्ट पुन्हा सिद्ध झाली की, एक उमेदवार व त्याच्या राजकीय पक्षाला हा मतदारसंघ पुन्हा पुन्हा साथ देत नाही. मध्य विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काय परिस्थिती असेल याचा अंदाज बांधताना, गेल्या निवडणुकीतील इतिहास, त्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांचाही विचार करणे क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील प्रश्न, वर्षानुवर्षांच्या समस्या व विद्यमान लोकप्रतिनिधींनी केलेली कामे याचाही ताळमेळ घालावा लागेल. लोकसभा निवडणुकीत मतदारांचा बदललेला कौल पाहता, विधानसभा निवडणुकीतही भाकरी फिरेल असे मानावयास हरकत नाही.