सप्तशृंगी देवीच्या भक्तांवरचा टळला टोल
By Admin | Updated: December 1, 2015 22:49 IST2015-12-01T22:48:54+5:302015-12-01T22:49:34+5:30
अध्यक्ष-उपाध्यक्षांनी मागविला फेरप्रस्ताव

सप्तशृंगी देवीच्या भक्तांवरचा टळला टोल
नाशिक : काही दिवसांपूर्वीच सरसकट सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दोन रुपये टोल लावण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सभेत फेटाळण्यात आला होता.
मंगळवारी (दि.१) स्थायी समितीच्या बैठकीत या टोलचा विषय उपस्थित झाल्यावर अध्यक्ष विजयश्री चुंबळे व उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी संबंधित ट्रस्टने त्यांच्या उत्पन्नातून काही हिस्सा ग्रामपंचायतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच गडावर येणाऱ्या भाविकांसाठीच्या वाहनावर कर लावण्याबाबतचा फेर प्रस्ताव ग्रामपंचायतीने सादर करावा, असे सांगत हा ‘टोल’चा विषय बैठकीत टोलविला.
स्थायी समितीच्या बैठकीत आयत्या वेळीच्या विषयात प्रा. अनिल पाटील यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. प्रा. अनिल पाटील यांनी सांगितले की, आपण नुकतेच सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाऊन आलो. तेथील ग्रामपंचायतीला भक्तांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पदरमोड करावा लागतो. त्यामुळे या ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे पाठविलेल्या भक्तांच्या वाहनांवरील कर आकारणीचा प्रस्ताव मान्य करण्याची सूचना केली.
त्याचबरोबर शिवसेना गटनेते प्रवीण जाधव यांनीही ग्रामपंचायतीने टोल भक्तांना नव्हे, तर वाहनांना लावला होता. त्याचा विपर्यास केला गेला. रस्त्याने आपण टोल भरतो, मग सप्तशृंग गडावर जाण्यासाठी टोल का नको, त्यामुळे गडावर येणाऱ्या व्यावसायिक वाहनांना कर आकारणी करावी, असे सांगत याबाबत आजच्या बैठकीत विषय मंजूर करण्याची सूचना केली. त्याचवेळी राष्ट्रवादीचे गटनेते रवींद्र देवरे यांनी भाविकांना किंवा त्यांच्या वाहनांना टोल नको, तसेच भाविकांची व व्यावसायिकांची वाहने कशी ओळखणार? असे सांगत याबाबत संबंधित ट्रस्टकडून उत्पन्नाच्या काही तरी हिस्सा ग्रामपंचायतीला सुधारणा व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी द्यावा, अशी सूचना केली. त्याचवेळी उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी ग्रामपंचायतीला भाविकांना सोयीसुविधाच उपलब्ध करून द्यायच्या असतील, तर वर्षाकाठी कोट्यवधी रुपये जमा होणाऱ्या ट्रस्टने ग्रामपंचायतीला मदत करावी, तसा ठराव आपण शासनाला पाठवू, तसेच आजच्या बैठकीत याबाबत सप्तशृंगगड ग्रामपंचायतीने प्रस्तावच पाठविलेला नाही, त्यामुळे यावर कोणताही धोरणात्मक निर्णय होणार नाही, असे स्पष्ट केले.
अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनीही सध्या ‘टोलमुक्तीचे’ वातावरण असताना भाविकांना किंवा वाहनांना असा कोणताही टोल आकारण्याऐवजी संबंधित ग्रामपंचायतीला ट्रस्टने त्यांच्या उत्पन्नातील काही हिस्सा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना केली. त्यामुळे सप्तशृंगी देवी भक्तांच्या माथी येऊ पाहणारा ‘टोल’ पुन्हा एकदा टळल्याची चर्चा जिल्हा परिषदेत होती. (प्रतिनिधी)