आघाडीचा आज फैसला
By Admin | Updated: January 15, 2017 00:44 IST2017-01-15T00:43:51+5:302017-01-15T00:44:06+5:30
कॉँग्रेसची बैठक : सटाण्यात राष्ट्रवादीकडून गोंजारण्याचा प्रयत्न

आघाडीचा आज फैसला
सटाणा : बागलाण तालुक्यात गेल्या एक दशकापासून राष्ट्रवादी कॉंग्रेसची चलती होती .त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत वेळोवेळी आघाडीसाठी हात देणार्या कॉंग्रेसला झीडकारून आघाडीची बिघाडी केली. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला आलेले अपयश पाहता आगामी निवडणुकांमध्ये आघाडीसाठी कॉंग्रेसला आवतन देऊन एकप्रकारे गोंजारण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिक पातळीवर आघाडीसाठी उभय पक्षांमध्ये चर्चेचे गुर्हाळ सुरु असले तरी रविवारी (दि.१५ जानेवारी ) पक्षिनरीक्षक डी.जी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थित सटाण्यात होणार्या कॉंग्रेसच्या बैठकीत आघाडीबाबत फैसला होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सटाणा पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबरच कॉंग्रेसचा पराभव झाल्याने उभय पक्ष धास्तावले आहेत. गेल्या दहा वर्षांचा इतिहास पाहता कॉंग्रेसने जेव्हा जेव्हा आघाडीसाठी राष्ट्रवादीला आवतन दिले त्या त्या वेळी राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी कॉंग्रेसला झीटकारल्याचे बघायला मिळाले. आता भाजप सेनेला रोखण्यासाठी राष्ट्रवादीने कॉंग्रेसला आवतन दिले आहे.
कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया ,शहराध्यक्ष किशोर कदम ,विजय पाटील ,प्रल्हाद पाटील ,जिल्हा परिषद सदस्य प्रा.अनिल पाटील यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत एका बंद खोलीत दोन तास चर्चे गुर्हाळ चालले .या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा संजय चव्हाण ,तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांनी ज्या गटात गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता असेल ते गट राष्ट्रवादीला सोडावेत असा प्रस्ताव कॉंग्रेस पुढे ठेवला. मात्र कॉंग्रेसने ठेंगोडा ,जायखेडा ,वीरगाव ,ताहाराबाद अशा चार गटांची मागणी केली आहे. या चर्चे दरम्यान कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कदम अधिकच आक्र मक होऊन राष्ट्रवादीला समोर पराभव दिसत असल्यामुळे कॉंग्रेसला गोंजारण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगून आघाडी करायची असेल तर ठेंगोडा ,जायखेडा ,पठावे दिगर ,वीरगाव असे चार गट कॉंग्रेसला द्या अशी भूमिका कदम यांनी घेतली. दोन्ही कॉंग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
बागलाण तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजे माजी आमदार संजय चव्हाण असे समीकरण आहे.शरद पवार कॉंग्रेस मधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून स्वतंत्र चूल मांडली.त्यावेळी नगराध्यक्षपदावर असतांना चव्हाण यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांसह पवारांसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला.तेव्हा पासूनच शहरात राष्ट्रवादीचे विचार रु जवून चव्हाण यांनी पक्षाला बळकट करण्याचे केले आहे. त्यानंतर पालिकेत राष्ट्रवादीची सत्ताही आली होती. (वार्ताहर)