बाराशे उपनिरीक्षकांकडून शेतकऱ्यांना तीन लाख
By Admin | Updated: January 30, 2016 23:46 IST2016-01-30T23:16:44+5:302016-01-30T23:46:12+5:30
सोशल मीडियावरून मदतीची हाक : २०१२ च्या तुकडीकडून ‘नाम’ला निधी

बाराशे उपनिरीक्षकांकडून शेतकऱ्यांना तीन लाख
संदीप झिरवाळ पंचवटी
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक २०१२ या वर्षातील सत्र क्रमांक १०८ या बॅचच्या अधिकाऱ्यांनी कर्तव्य करत असताना सामाजिक बांधीलकी जपत ३ लाख ११ हजार २०२ रुपयांच्या निधीचा धनादेश नाम फाउंडेशन संस्थेकडे सुपूर्द केला आहे. पोलीस उपनिरीक्षकांनी पुढाकार घेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर ओढावलेल्या अस्मानी संकटात शेतकऱ्यांप्रती असलेली जबाबदारी निभावत ‘शेतकरी जगला, तरच देश जगेल’ या भावनेला कृतीने जोड दिली आहे.
सध्या राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी नापिकतेमुळे व कर्जबाजारीला कंटाळून निराशेपोटी आत्महत्त्या करत आहेत. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आत्महत्त्या करण्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांना एक आधार म्हणून पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक १०८ बॅचतर्फे पुढाकार घेण्यात आला. संपूर्ण राज्यातील पोलीस उपनिरीक्षकांनी सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून व्हॉट््स अॅपच्या माध्यमातून ग्रुप तयार केला. निधी संकलनासाठी मुंबईतील प्रवीण सुरवाडे या पोलीस उपनिरीक्षकाने पुढाकार घेतला व अन्य पोलीस उपनिरीक्षकांच्या मदतीने या सत्कार्यासाठी व्हॉट््स अॅपवर ‘१०८ सेव्ह फार्मर’ ग्रुप असे १२ ग्रुप तयार करून राज्यातील सुमारे १२०० पोलीस उपनिरीक्षकांना एकत्र आणले व ‘१०८ सेव्ह फार्मर’ या व्हॉट््सअॅप ग्रुपवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी याबाबत संदेश पसरविण्यात आला. या ग्रुपच्या माध्यमातून पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंत उपनिरीक्षकांनी मदत केली.
याकामासाठी व्हॉट््सअॅपवर पोलीस उपनिरीक्षकांचे बॅँकेचे खाते क्रमांक पाठविण्यात आले होते. त्यानुसार खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जमा झालेली ३ लाख ११ हजार २०२ रुपयांची रक्कम पुणे येथील शिवगंगा प्रतिष्ठान या एनजीओच्या मदतीने जमा करण्यात आली त्यानंतर सदरच्या मदतनिधीचा धनादेश नाम फाउंडेशनचे विश्वस्त मकरंद अनासपुरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.