चोर पल्सरवर; पोलीस सायकलवर
By Admin | Updated: November 17, 2015 23:58 IST2015-11-17T23:56:39+5:302015-11-17T23:58:23+5:30
चोर पल्सरवर; पोलीस सायकलवर

चोर पल्सरवर; पोलीस सायकलवर
नाशिक : कोणत्याही गोष्टीचे विशिष्ट प्रयोजन जसे असते, तसेच ती गोष्ट कधी करायची, कोणी करायची यावरही बरेचसे अवलंबून असते. म्हणजे सांगायचा मतलब इतकाच की, लहानपणी वेळेत शाळा गाठणे असो की, शाळेविषयी गोडी वाटावी म्हणून आई-बाबांनी सायकल घेऊन द्यावी व नवीन सायकल हाती पडताच, अगदी हाकेचे अंतर कापण्यासाठी का होईना सायकलचा मुक्त वापर केला जावा हे नवशिक्या मुलांकडूनच अपेक्षित आहे. आता काळानुरूप परिस्थिती बदलली. मिसूरडेही न फुटलेल्यांना मोपेड, बाइकची ओढ सुटत नाही, किंबहुना स्व-वजनापेक्षा न तोलवल्या जाणाऱ्या वाहनांचा वारेमाप वापर सुरू असताना, पुन्हा त्याच न पळणाऱ्या सायकलीचा आग्रह कोण बरे धरेल? पण नाही, अजूनही सायकलीचा फक्त आर्थिक परिस्थितीशी सामना करणाऱ्यांकडून जसा वाहन म्हणून वापर केला जातो, तसा तो आर्थिक सुबत्तेत ओतप्रोत न्हाऊन निघालेल्यांकडूनही हौस वा शारीरिक तंदुरुस्तीसाठी वापर केला जातो. याचाच अर्थ सायकलीचा वापर एक तर लहानपणाची हौस आणि दुसरे म्हणजे आर्थिक परिस्थितीशी निगडित राहिलेला आहे. परंतु याच सायकलीचा वापर आता गुन्हेगार शोध मोहिमेसाठी करण्याचा निर्णय पोलीस खात्याने घेऊन लगोलग त्याची अंमलबजावणीही सुरू केली. घरात अडगळीत पडलेल्या सायकलींची डागडुजी करण्यात आली, तर सायकलीशी लहानपणानंतर कधीच संबंध न आलेल्यांनी सरकारचा फतवा म्हणून सायकली विकत (?) घेण्यास सुरुवात केली आहे. म्हणजे पुन्हा एकदा आता सायकलींना चांगले दिवस येण्याची शक्यता जशी नाकारता येत नाही, तसेच सध्याच्या ढेरपोट्या पोलिसांचे ‘स्मार्टनेस’मध्ये रूपांतर होण्याचे दिवसही फार दूर नाही, असा आशावाद बाळगण्यास हरकत नसावी; पण सायकलीचा संबंध आता तेवढ्या पुरताच मर्यादित राहिलेला नाही, तर गल्ली-बोळ अगदीच एका व्यक्तीचाच शिरकाव होऊ शकेल, अशा चिंचोळ्या रस्त्यात जीव मुठीत घेऊन रहिवास करणाऱ्या नागरिकांच्या संरक्षणासाठी केला जाणार आहे. एरव्ही गुन्हेगार फक्त शहरातील प्रमुख रस्त्यावरून आणि तेही आलिशान चारचाकी व भरधाव धावणाऱ्या दुचाकीचाच वापर करतात म्हणून त्यांच्या अटकावासाठी दिवसा व रात्री नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांचाच बहुधा हळूहळू भ्रमनिरास होत असावा, कारण दोन-चार तास सलग ऊन, वारा, पावसात उभे राहूनही नाकाबंदीत ‘सावज’ गवसत नाही म्हटल्यावर ‘सावजा’ने मुख्य रस्त्यावरून गल्ली-बोळाकडे केंद्र हलविले असावे किंवा पोलीस नेहमीच मुख्य रस्त्यावरच शोध घेतात म्हणून चौर्यक्रमासाठी बंगले, कॉलन्या, सोसायट्या सोडून दाट वस्तीची चोरट्यांनी निवड केल्याचा सुगावा पोलिसांना लागला असावा. त्यामुळे अगोदरच पळण्यात पटाईत व उड्या मारण्यात चपळ असलेल्या चोरट्यांचा गल्ली-बोळात शोध घेण्यासाठी सायकलीशिवाय पर्यायच नसल्याचा साक्षात्कार पोलीस यंत्रणेला झाला व त्यावर उपाय म्हणून फक्त सायकल हाच पर्याय पोलीस प्रमुखासमोर उभा ठाकला आहे. परिणामी एरव्ही पोलीस वाहनाच्या काचा खाली न करणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका दिवसात जमिनीवर येत सायकलीचा शहरभर वापर करणाऱ्या छबी सर्वत्र झळकल्या आहेत. सारेच सायकलीने रस्त्यावर उतरल्यानंतर किती गुन्हेगार हाती आले वा सायकलीपेक्षाही वेगाने पळत फरार झाले हे समजू शकले नाही; मात्र स्कॉटलॅँड यार्ड पोलिसांशी तुलना करीत स्वत:ची डिमडीमकी वाजवून घेणाऱ्या पोलिसांची सायकल गुन्हेगाराच्या आधुनिक वाहनापेक्षा वेगाने पळू शकेल काय असा अगदीच सामान्यातील सामान्य व्यक्तीला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर कोणालाच सापडलेले नाही.