पंचवटीत पुन्हा टोळीयुद्ध पेटले
By Admin | Updated: June 29, 2014 00:05 IST2014-06-28T22:56:54+5:302014-06-29T00:05:39+5:30
पंचवटीत पुन्हा टोळीयुद्ध पेटले

पंचवटीत पुन्हा टोळीयुद्ध पेटले
पंचवटी : परिसरात गेल्या महिनाभरापासून गुंडप्रवृत्तीच्या टोळक्याने दहशत माजविण्यास सुरुवात केली असून, यात तडीपार गुंडांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. विविध गुन्हे असल्याच्या कारणावरून पोलिसांनी तडीपार केलेले गुंड सर्रासपणे पुन्हा आपापल्या परिसरात खुलेआम वावरत असले तरी पोलीस प्रशासन त्याबाबत अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पंचवटी परिसरात गेल्या महिनाभरात जवळपास चार ते पाच मारहाणीच्या तसेच शस्त्राने वार केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या घटनेत तडीपार गुंडांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. विविध गुन्ह्यांत तडीपार केलेले गुंड पोलिसांची नजर चुकवून पुन्हा परिसरात खुलेआम वास्तव्य करीत असले तरी पोलिसांना त्याचा थांगपत्ता लागत नाही. कोम्बिंग आॅपरेशन, आॅल आउट, गुन्हेगार तपासणी यांसारख्या मोहिमा पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार संपूर्ण शहरात राबविल्या जात असल्या तरी या मोहिमेतून गुन्हेगार हाती सापडत नसल्याने पोलीस प्रशासनाचे उपक्रम केवळ नावापुरतेच उरले असल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. गेल्या महिनाभरात पंचवटी परिसरात घडलेल्या घटना टोळी युद्धातून झाल्या असून, यापूर्वी त्यातूनच प्राणघातक हल्ला, खुनाच्या घटना घडलेल्या होत्या. गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंधित असलेल्या गुन्हेगारी टोळक्याने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केल्याने आगामी कालावधीत या टोळक्यांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्याची दाट शक्यता आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या काही घटनांतील संशयितांना पोलिसांनी जेरबंद केले असले तरी या तडीपार गुंडांसह टवाळखोरी करणाऱ्यांच्या मुसक्या वेळीच आवळणे गरजेचे झाले आहे. गुन्हा शोध पथकातील कर्मचारी गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अपयशी ठरत असून, पोलीस व गुन्हेगार यांच्यातील लागेबांधे यांचीही उघडपणे चर्चा होऊ लागली आहे. (वार्ताहर)