आर्थिक निकषावर आरक्षण असावे
By Admin | Updated: September 25, 2016 01:44 IST2016-09-25T01:44:02+5:302016-09-25T01:44:24+5:30
उदयनराजे भोसले यांची मागणी

आर्थिक निकषावर आरक्षण असावे
नाशिक : मराठेतर आरक्षणामुळे समाजात मोठी दुही निर्माण झाली असून, त्यामुळे सामाजिक समता राहिलेली नाही. या विषमतेचा फटका मराठा समाजातील तरुण पिढीला बसला आहे. कुणाच्याही आरक्षणाला आमचा विरोध नाही तर इतर समाजाचीही सामाजिक प्रगती झाली पाहिजे. मात्र जातीनिहाय आरक्षण न देता आर्थिक निकषांवर आधारीत आरक्षण असले पाहिजे असे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विशेष अधिवेशन बोलविले पाहिजे, अशी भूमिकाही मांडली.
नाशिकमधील मराठा क्रांती मोर्चासाठी उपस्थित असलेले उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारची धोरणे आणि सर्वच पक्षांच्या नेत्यांवर तोफ डागली. छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित स्वराज्य अद्यापही मिळाले नसून यास निष्क्रिय सरकारे जबाबदार आहेत. सरकार कोणत्याही पक्षाचे असो त्यांची मानसिकता केवळ मराठा समाजाला वापरून घेण्याचीच असल्याचे भोसले म्हणाले. भारतीय राज्य घटनेच्या प्रस्तावनेत ‘समानता’ हा एक मुद्दा आहे, परंतु ही समानता खरेच आहे का? आरक्षणाला आमचा विरोध नाही, समाजातील उपेक्षित घटकाला आरक्षण मिळालेच पाहिजे. आरक्षण हे जातीवर नव्हे तर आर्थिक निकषांवर मिळायला हवे, असेही उदयनराजे भोसले म्हणाले.
मराठेतर आरक्षणामुळे मराठा समाजातील तरुणांना शिक्षण आणि तरुणांना नोकरीत न्याय मिळत नाही, ही चीड त्यांच्या मनात आहे. कालची जी परिस्थिती होती ती आज नाही, त्यामुळे आरक्षण रचनेचे पुनर्विचार करायला हवा. मराठा समाजाचा विचार कोणताही पक्ष करीत नाही, त्याप्रमाणेच मराठा समाजातील प्रस्थापितांनी विस्थापित मराठा तयार केले, असा आरोपही उदयनराजे यांनी केला. मराठा समाज हा आरक्षणाची भीक मागणार नाही, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी राज्य सरकारने जीएसटीप्रमाणे विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाबाबत तत्काळ निर्णय घ्यावा. अन्यथा होणाऱ्या परिणामांना राज्य आणि केंद्र या दोघांनाही सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर मराठा तरुणांमध्ये प्रसंगी नक्षलीप्रमाणे चळवळ उभी राहिल प्रसंगी आपण या चळवळीचे नेतृत्वही करू असेही उदयनराजे म्हणाले.
तर घटनेत बदल करा
अॅट्रॉसिटी कायद्यामुळे मराठा तरुणांवर अन्याय होत आहे. अनेकांवर खोट्या केसेसे असून यात बदल झाला पाहिजे. ज्या काळात हा कायदा झाला त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. काळानुरूप समाज बदलत असल्याने काद्यातही बदल होणे अपेक्षित आहे. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल होऊ शकत नसतील तर घटनेतील तरतुदीत बदल करा, असेही उदयनराजे भोसले म्हणाले.
आरोपीस गोळ्या घाला
४कोपर्डी प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी भर चौकात जनतेसमोर फाशी दिली पाहिजे किंवा त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे सांगून सरकारला हे जमणार नसेल तर त्याला आमच्या ताब्यात द्या, बघा आम्ही काय करतो, असेही उदयनराजे म्हणाले.