जिल्ह्यात ‘स्वाइन फ्लू’चे २१ बळी
By Admin | Updated: April 2, 2017 01:44 IST2017-04-02T01:43:10+5:302017-04-02T01:44:08+5:30
नाशिक : जिल्ह्यात स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, गत तीन महिन्यांत २० जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात ‘स्वाइन फ्लू’चे २१ बळी
नाशिक : जिल्ह्यात स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, गत तीन महिन्यांत २० जणांचा मृत्यू झाला आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या म्हसरूळ येथील बाळासाहेब माधव जाधव (५८) यांचा शनिवारी (दि़१) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ यामुळे जिल्ह्यातील स्वाइन फ्लू बळींची संख्या २१ वर पोहोचली आहे़ दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दररोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे़
शहर व जिल्ह्यात अशा दोन्ही ठिकाणी स्वाइन फ्लूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे़ शनिवारी (दि़१) पर्यंत जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात सहा, तर महापालिकेच्या रुग्णांलयांमध्ये ३१ अशा ३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ गत तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद व महापालिका हद्दीतील ४ हजार ४१४ रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले़ त्यामध्ये ३९८ संशयितांना त्वरित टॅमी फ्लूची औषधे देण्यात आली़
जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत २१ नागरिकांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे़ शनिवारी मृत्युमुखी पडलेल्या व खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाळासाहेब जाधव यांचा तपासणी अहवाल अद्याप जिल्हा रुग्णालयास मिळालेला नाही़ (प्रतिनिधी)‘इन्फल्युएंझा ए किंवा बी’ नामक वायरसमुळे जेव्हा सर्दी-ताप-अंगदुखी अशी लक्षणं येतात तेव्हा त्या आजाराला वैद्यकीय परिभाषेत ‘फ्लू’ असं संबोधतात़ मुळात स्वाइन फ्लू हा श्वसनाचा आजार ‘इन्फल्युएंझा ए नामक’ वायरस श्वसनमार्गाच्या संपर्कात आल्यामुळे होतो. सर्वात प्रथम या वायरसचा प्रादुर्भाव २००९ साली मेक्सिको येथे आढळून आला.या वायरसच्या पृष्ठभागावर दोन महत्त्वाचे अँटिजिन्स असतात. अँटिजीन्स म्हणजे अँटिबॉडीज निर्माण करण्यासाठी रक्ताला उत्तेजित करणारा पदार्थ. यास सरफेस अँटीजन असे म्हणतात. .स्वाइन फ्लूची सुरुवातीची लक्षणे ही साध्या तापाप्रमाणेच असतात. मात्र तापाचे प्रमाण तसेच घशातील संसर्गाचे प्रमाण वाढले तर ओसेल्टामिव्हीर सुरू करता येईल. प्रत्येक वेळी चाचणी करण्याची तसेच त्याच्या निकालाची वाट पाहण्याऐवजी वेळीच उपचार करणे अधिक योग्य आहे. स्वाइन फ्लू आणि साध्या तापामधील फरक ओळखणे कठीण असल्याने काही वेळेला योग्य उपचाराविना रुग्णांची स्थिती गंभीर होते, असे निदर्शनास येते. मात्र स्वाइन फ्लूच्या चाचणीची वाट न पाहता लक्षणांवरून उपचार सुरू केले तर स्वाइन फ्लू हा प्राणघातक ठरणार नाही. या आजारावर आॅसेलटॅमीवीर व झानामीवीर ही औषधे गुणकारी आहेत.
विषाणू राहतात हवेत आठ तास जिवंत
स्वाइन फ्लूचे विषाणू हवेत आठ तास जिवंत राहू शकतो. या व्यक्तीच्या खोकण्याने, शिंकण्याने हवेत उडणाऱ्या तुषारातील विषाणू धूलिकणावेष्टीत स्वरूपात जिवंत राहतात. तसेच हे विषाणू खुर्ची, टेबलसारख्या ठिकाणीही जिवंत राहतात. या विषाणूंचा नाक, डोळे, तोंड यांसारख्या घाणेंद्रियांशी संपर्क आल्यास संक्रमण होते.