...तर थेट वाहन परवान्यांचे निलंबन
By Admin | Updated: March 17, 2017 00:01 IST2017-03-17T00:00:53+5:302017-03-17T00:01:14+5:30
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश : वाहतुकीच्या ‘त्या’ सहा नियमांचे उल्लंघन भोवणार

...तर थेट वाहन परवान्यांचे निलंबन
नाशिक : शहरातील वाहतूक व्यवस्था अधिकाधिक सक्षम व्हावी, जेणेकरून रस्त्यावर होणाऱ्या अपघातांना आळा बसण्यास मदत होईल, यादृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने प्रादेशिक परिवहन विभागाला वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनचालकाचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याचा आदेश दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा समितीकडून शहराच्या प्रादेशिक परिवहन विभागाला थेट सहा वाहतुकीच्या नियमांची काटेकोरपणे शहरात अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी आदेशित केले आहे. तसेच या नियमांचे वाहनचालकांनी उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधितांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी आयुक्तालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. शहरासह संपूर्ण जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन विभागाकडून न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहराच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, दंडात्मक कारवाईचा कुठलाही परिणाम बेशिस्त वाहनचालकांवर होत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी प्रादेशिक परिवहन विभागाने सुमारे दहा कोटी रुपयांचा दंड विविध वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन व गुन्ह्यांप्रकरणी वसूल केल्याचे कळसकर यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, शहरात शहर वाहतुक पोलिसांची मदत घेऊन संयुक्तरीत्या कारवाई करण्यात येणार असल्याचे कळसकर म्हणाले. (प्रतिनिधी)