...तर ‘अॅप्टीट्यूड टेस्ट’ होणार सक्तीची
By Admin | Updated: August 13, 2014 00:42 IST2014-08-13T00:21:47+5:302014-08-13T00:42:12+5:30
विनोद तावडे : विद्यार्थी गुणगौरव सोहळा

...तर ‘अॅप्टीट्यूड टेस्ट’ होणार सक्तीची
सिडको : शालेय शिक्षण पद्धतीत गेल्या अनेक वर्षांपासून बदल झालेला नाही. यापुढील काळात महाराष्ट्रात जर भाजपाची सत्ता आल्यास मुलींची अभ्यासाची क्षमता तपासण्यासाठी इयत्ता दहावी व बारावीनंतर काय याबाबत सर्व शाळांमध्ये अॅप्टीट्यूड टेस्ट घेण्याचे सक्तीचे करणार असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार विनोद तावडे यांनी सांगितले.
भोळे मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे सिडको मंडल अध्यक्ष जगन पाटील यांनी आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव व प्रवेश सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना तावडे बोलत होते. यावेळी तावडे म्हणाले की, सिडको-सातपूर या नाशिक पश्चिम मतदारसंघात विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व ज्येष्ठ नागरिकांचा गौरव हा उपक्रम राबविणे आजच्या काळात गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात बदल झालेला नाही. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान दिले जाते, परंतु त्यामागील घटना स्पष्ट केली जात नाही. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसण झाले पाहिजे. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी माहिती न कळता त्यातील जिज्ञासा समजली पाहिजे. आजचे युग हे इंटरनेटचे आहे. यामुळे घरातील प्रत्येकास इंटरनेट येणे गरजेचे आहे. आपला मुलगा इंटरनेटमध्ये काय करतो याबाबतची सखोल माहिती घरातल्यांना असणे गरजेचे आहे.
आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव तर झालाच पाहिजे परंतु यापलीकडे जाऊन दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे यासाठी भाजपा सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम सर्व शाळांमध्ये अॅप्टीट्यूड टेस्ट सक्तीची करणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले. याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळावा, त्यांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी नवीन धोरण अंमलात आणणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले.
प्रास्ताविकात आयोजक जगन पाटील म्हणाले की, सिडको व सातपूर या पश्चिम मतदारसंघात सर्वसामान्य नागरिक राहतात. त्यांच्या मुला-मुलींचा गौरव व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्याची गरज असल्यानेच हा उपक्रम घेतल्याचे सांगितले. आमदार गिरीश महाजन, माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर, भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी आदिंनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर उपमहापौर सतीश कुलकर्णी, देवयानी फरांदे, गोपाळ पाटील, प्रदीप पेशकार, बाळासाहेब पाटील, सुहास फरांदे, कैलास अहिरे, सुरेखा पाटील, ललिता भावसार, विक्रम नागरे, प्रकाश अमृतकर, रवि पाटील, हेमंत अहेर, प्रकाश बागुल, आर. आर. पाटील, रामहरी संभेराव, साहेबराव आव्हाड, यशवंत नेरकर आदि उपस्थित होते. (वार्ताहर)