वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षी भरली त्यांची शाळा
By Admin | Updated: May 6, 2016 00:24 IST2016-05-05T23:06:36+5:302016-05-06T00:24:14+5:30
वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षी भरली त्यांची शाळा

वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षी भरली त्यांची शाळा
नाशिक : ते सारे जुनेच विद्यार्थी, म्हणजे जुन्या मॅट्रिकची परीक्षा एकसाथ देणारे, परीक्षा संपली आणि कोण कोठे नोकरदार, कोणी व्यावसायिक, तर कुणी पौरोहित्य करणारे. परंतु या सर्वांनी एकत्र येत स्नेहमेळावा भरविला आणि वयाचा अमृतमहोत्सवही एकत्र साजरा केला.
नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयाची जुन्या मॅट्रिकचीच ही १९५८ची बॅच. या बॅचमधील सारेच क्रियाशील असल्याने कोणी शिक्षक, तर कोणी सरकारी नोकरदार बनले. दत्तात्रेय पैठणकर तर गुलालवाडीत खेळ शिकवण्यापासून यजुर्वेदीय ब्राह्मण संघ आणि पुरोहित संघाचे अध्वर्यू, रमेश देशमुख शिक्षक ते मुख्याध्यापक असे सारेच काही आपापल्या क्षेत्रात नाव कमविणारे आता निवृत्तीनंतरचे जीवन जगत असले तरी जिवाभावाच्या मित्रांना कोणीही विसरलेले नाही. त्यामुळेच या बॅचमधील सर्व माजी विद्यार्थ्यांचा त्यांची मुले, सुना नातवांसहित स्नेह मेळावा पंचवटीतील गोपाल मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी वयोमर्यादा एक सारखी नसली तरी बहुतांशी सारेच वयाची पंचाहत्तरी साजरी करणारे असल्याने या स्नेहमेळाव्याला वेगळेच महत्त्व होते. यावेळी दत्तात्रेय पैठणकर, वसंत दांडेकर, कांतीलाल पवार, सुभाष लेले, वसंत अभ्यंकर, श्रीपाद गोखले आदिंचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. पैठणकर यांच्या भगिनी सुवर्णा गायधनी यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. सुभाष लेले यांनी गीत रामायणातील दोन गीते सादर केली. वसुंधरा बापट यांनी सेनापती बापट आणि त्यांची पत्नी रुख्मिणीबाई यांच्या जीवनावर कथाकथन सादर केले. रमेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)