नाशिकमध्ये तणाव निवळला
By Admin | Updated: October 11, 2016 00:28 IST2016-10-11T00:21:36+5:302016-10-11T00:28:21+5:30
जनजीवन पूर्वपदावर : शाळा, महाविद्यालये बंद; गृहराज्यमंत्र्यांची भेट

नाशिकमध्ये तणाव निवळला
नाशिक : तळेगाव येथील अत्याचार प्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली आंदोलने आणि दगडफेकीमुळे निर्माण झालेला
तणाव निवळला असून, जनजीवन पूर्वपदावर येण्यास प्रारंभ झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गही सुरळीत सुरू झाला आहे. सोमवारी जिल्ह्याचा ग्रामीण भाग वगळता शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. रविवारी
रात्री उशिरापर्यंत तणावाच्या पार्श्वभूमीवर बहुतांशी शाळा, महाविद्यालये
बंद होती. आंदोलकांनी केलेल्या शहर आणि ग्रामीण बसेसच्या नुकसानीमुळेबससेवा मात्र सोमवारीही बंद ठेवण्यात आली होती.
दरम्यान, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नाशिकमध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पंधरा दिवसांच्या आत आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल करू, असे स्पष्ट केले.
शनिवारी तळेगाव येथे बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याच्या घटनेनंतर जिल्हाभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. काही ठिकाणी शांततेत रास्ता रोको करण्यात आला तर काही ठिकाणी वाहनांची जाळपोळ, दगडफेक अशी हिंसक आंदोलने झाली. त्यामुळे आत्तापर्यंत ३५ पोलीस जखमी झाले आहेत. सोमवारी शहरातील नाशिकरोड, गंगापूर यांसह काही भागात किरकोळ आंदोलने झाली. तर ग्रामीण भागात दिंंडोरी तालुका बंद ठेवून मूक मोर्चा काढण्यात आला. या व्यतिरिक्त कळवण, निफाड तालुक्यातील चांदोरी, विंचूर आणि नैताळे तसेच येवला, नांदगाव, चांदवड तालुक्यातील वडाळभोई येथे रास्ता रोको आंदोलने करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये सुमारे वीस बसगाड्यांचे नुकसान झाल्याने शहर आणि लांबपल्ल्याच्या बससेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
सोमवारी सकाळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नाशिक येथे येऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सदर घटनेतील संबंधित आरोपीविरुद्ध पंधरा दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल, असे केसरकर यांनी पत्रकारांना सांगितले. तर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी नाशिकमधील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि शांतता समिती सदस्यांची बैठक घेतली. शहरात जमावबंदी लागू करण्यात आली असून, राजकीय पक्षांनी शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
(प्रतिनिधी)
जिल्ह्यातील मोबाइल इंटरनेट बंद
सोशल मीडियावर अफवांचा बाजार सुरू असून, तो रोखण्यासाठी पोलिसांनी नाशिक शहरासह जिल्ह्यातील सर्व मोबाइल इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. खासगी कंपन्या आणि बीएसएनएलने जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार इंटरनेट बंद केल्याचे कळविले आहे. त्यामुळे मोबाइलवरील व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियावर बंदी आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर दोन दिवस तात्पुरत्या स्वरूपात ही सेवा बंद असेल, असे जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी सांगितले. मोबाइल बंदमुळे अनेकांचे हाल झाले असले, तरी यंत्रणेने उचललेल्या या पावलाचे सर्वसामान्यस्तरावर स्वागत करण्यात येत आहे.