समुपदेशकांवरच येतोय ताण
By Admin | Updated: July 2, 2014 00:17 IST2014-07-01T23:00:58+5:302014-07-02T00:17:43+5:30
सेवेची सक्ती : विनामोबदला विद्यार्थ्यांसाठी करावी लागते चोवीस तास ड्यूटी

समुपदेशकांवरच येतोय ताण
नाशिक : दहावी आणि बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या, तसेच कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे मनोधैर्य उंचावण्याची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या समुपदेशकांवरील ताण वाढला आहे. त्यांच्या मर्जीशिवाय आणि विनामोबदला त्यांना या समुपदेशनाच्या कामाला जुंपले जात असून, त्यातून त्यांना कोणत्याही प्रकारे पैसा आणि प्रतिष्ठा मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.
दहावी, बारावीतील अनुत्तीर्ण मुलांना अपयशाच्या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य परीक्षा मंडळाने समुपदेशकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रत्येक विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील नोंदणीकृत समुपदेशकांची यासाठी नियुक्ती केली जाते. त्याप्रमाणेच नाशिक विभागातील चारही जिल्ह्यांसाठी त्या-त्या जिल्ह्यातील समुपदेशकांची नियुक्ती केली जाते.
जेव्हा दहावी किंवा बारावीचा निकाल असतो तेव्हा विभागीय मंडळाकडून व्यवसाय मार्गदर्शन केंद्राकडून समुपदेशकांची नावे मागविली जातात. अशी नावे प्राप्त झाल्यानंतर मंडळाकडून त्यांची नावे जाहीर केली जातात. विशेष म्हणजे अशा प्रकारे आपल्या नावाच्या निवडीपासून ते त्यांचे नाव आणि भ्रमणध्वनी क्रमांक छापण्यापासून समुपदेशकांना कोणतीही पूर्वसूचनाच दिली जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विभागीय मंडळाकडून या समुपदेशकांना साधा संपर्कही साधला जात नाही किंवा त्यांचे भ्रमणध्वनी कार्यान्वित आहेत किंवा नाहीत, याची कोणतीही शहानिशाच केली जात नाही. गेल्या काही वर्षांपासून समुपदेशकांमध्ये याविषयीची नाराजी आहे. मात्र त्यांच्या तक्रारीला वारंवार केराची टोपली दाखविली जाते.
जे हजारो विद्यार्थी कदाचित मंडळाकडे तक्रारीचे फोन करू शकतात, असे सारे फोन कॉल्स या समुपदेशकांना येतात. पर्यायाने मंडळावरील ताण कमी होतोच, शिवाय पालक आणि विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शनही मिळते. निदान ही कृतज्ञता ओळखून तरी विभागीय मंडळाने या समुपदेशकांना मानधन सुरू करावे, अशी अपेक्षा आहे; मात्र त्याबाबत कुणीही बोलण्यास तयार नाही. मुंबईतील विभागीय परीक्षा मंडळाकडून समुपदेशकांना मानधन सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर नाशिक विभागातील समुपदेशकांना मानधन सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र समुपदेशक स्पष्टपणे ही बाब सांगू शकत नसल्याने त्यांच्यावरच ताण वाढला असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)ा तास ड्यूटी