दहा गावांचे होणार परीक्षण
By Admin | Updated: May 4, 2017 00:42 IST2017-05-04T00:42:18+5:302017-05-04T00:42:56+5:30
खत प्रकल्प कंपनीचा पुढाकार सामाजिक व पर्यावरणीय अहवालानुसार सुधारणा

दहा गावांचे होणार परीक्षण
नाशिक : जानेवारी २०१७ पासून महापालिकेच्या खतप्रकल्पाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मेलहॅम आणि आयकॉस या कंपनीमार्फत एकेक सुधारणेवर भर दिला जात असून, खतप्रकल्प परिसरातील सुमारे दहा गावांचे सामाजिक व पर्यावरणीय परीक्षण केले जात आहे. सदर परीक्षणाच्या अहवालानंतर खतप्रकल्पात आणखी सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती मेलहॅम इंजिनिअरिंग प्रा. लिमिटेड या कंपनीचे चेअरमन सुरेश रेगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सुमारे १७ वर्षांपूर्वी नागरिकांच्या प्रचंड विरोधानंतर पाथर्डी येथे पांडवलेणीच्या पायथ्याशी महापालिकेने विल्होळी, गौळाणे, पाथर्डी व सारूळ या गावांच्या आसपास असलेल्या सुमारे ८७ एकर जागेवर कचरा डेपो स्थलांतरित केला. त्यावेळी झालेल्या संघर्षात एकाचा बळीही गेला होता. मनपाने काही वर्षे खतप्रकल्प सुरळीत चालविला, परंतु नंतर कचऱ्याचे प्रचंड ढिगारे वाढून परिसरातील गावांमधील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला.