टॅँकरच्या पाण्यामुळे कोट्यवधीची झळ !
By Admin | Updated: June 13, 2014 00:22 IST2014-06-12T22:07:55+5:302014-06-13T00:22:29+5:30
सिन्नर तालुक्यासाठी दररोज सुमारे पाच लाख ८७ हजार रुपये खर्च येतो.
टॅँकरच्या पाण्यामुळे कोट्यवधीची झळ !
शैलेश कर्पे
सिन्नर
गेल्या अनेक वर्षांपासून सिन्नरकरांचे टॅँकरसोबत निर्माण झालेले नाते दिवसेंदिवस अधिक गहिरे होत असल्याचे चित्र आहे. सिन्नर तालुक्यात ४० गावे व २१६ वाड्या-वस्त्यांना ६६ टॅँकरद्वारे दररोज सुमारे २४० फेऱ्या सुरू आहेत. या टॅँकरच्या खर्चापोटी शासनाला फक्त सिन्नर तालुक्यासाठी दररोज सुमारे पाच लाख ८७ हजार रुपये खर्च येतो. तीन वर्षांत सिन्नर तालुक्यातील टॅँकरच्या खर्चापोटी शासनाला ११ कोटी २० लाख रुपये मोजावे लागल्याचे आकडेवारीहून दिसून येते.
सिन्नर तालुका अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जातो. दरवर्षी उन्हाळ्यात येथील जनतेची तहान भागविण्यासाठी टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. विशेषत: तालुक्याच्या पूर्वभागातील काही गावांना तर पावसाळ्यातही टॅँकरच्या फेऱ्या सुरूठेवण्याची वेळ येते. इतकी पाणीटंचाईची तीव्रता भयानक आहे. गेल्या चार वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्याने तालुक्यातील काही गावांना तर अक्षरश: सलग तीन वर्षांपासून टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. ५ मे २०११ पासून ते आजपर्यंत काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
६६ टॅँकरमध्ये २१ शासकीय टॅँकर असून, ४५ खासगी टॅँकर आहेत. दररोज या टॅँकरच्या इंधन, पाणीपट्टी, टॅँकरभाडे, चालकांचा प्रवासभत्ता, विहीर अधिग्रहण यापोटी दररोज पाच लाख ८७ हजार ९२० रुपये खर्च येतो. तीन वर्षांत टॅँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आलेला ११ कोटी २० लाख रुपयांची आकडेवारी पाहिल्यानंतर मती गुंग होते. दरवर्षी उन्हाळ्यात टॅँकरसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतो. त्यापेक्षा टंचाईग्रस्त गावांमध्ये कायमस्वरूपी पाणीयोजना राबविल्यास टॅँकरवरचा खर्च बंद होईल व ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी भटंकती बंद होईल.
सिन्नर तालुका ‘टॅँकरमुक्त’ करण्याचा घोषणा अनेक लोकप्रतिनिधींनी केल्या. मात्र दरवर्षी टॅँकरची संख्या व टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. फक्त टॅँकरने पाणी पुरविण्यासाठी दरवर्षी सरासरी साडेतीन कोटी रुपये खर्च होतो. तालुका खऱ्या अर्थाने टॅँकरमुक्त करण्यासाठी शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींना तळमळीने काम करून कायमस्वरूपी पाणीयोजना राबविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.